राज्यात आजपासून संचारबंदी लागू, जिल्ह्या जिल्ह्यांच्या सीमाही बंद – उद्धव ठाकरे

मुंबई । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी राज्यात आजपासून कलम 144 लागू करण्यात आले असतानाही रस्त्यांवरील वर्दळ कमी होत नसल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसंगी कर्फ्यू लावला जाईल, असे स्पष्ट शब्दांत बजावले आहे. दरम्यान यावर बोलताना मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना प्रादुर्भावाच्या निर्णायक टप्प्यावर आलो आहोत, वेळीच रोखलं नाही तर कोरोनाने जगात जसं थैमान घातलं, तसं होईल.

पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही, आंतरजिल्हा सीमा सील करण्यात आल्या आहेत. ज्या जिल्ह्यात हा विषाणू पोहोचला नाही, त्या जिल्ह्यात हा विषाणू पोहचू नये, हा यामागचा उद्देश आहे, असेही ठाकरेंनी सांगितले. संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, हा काळ महत्वाचा असून ही वेळ निघून जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

खाजगी वाहने, बस यांच्यावर बंधन लादली आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं घोषित केलेली जमावबंदी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. प्रत्येक शहरात पोलीस गस्त घालत असून सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं, यासाठी काळजी घेत आहेत. 

अन्नधान्य, किराणा, दूध, औषधे, बेकरी, कृषीविषयक दुकाने, पाळीव प्राण्यांशी संबंधित दुकाने सुरु राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु राहील अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. रेल्वे, बस, खासगी वाहनेही बंद, जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी देण्यात आली आहे.

 राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमा बंद करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी प्रसंगी कठोर पावले टाकावी लागत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: