राज्याचा मुख्यमंत्री कोण? आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका:उध्दव ठाकरे

राज्याचा मुख्यमंत्री कोण? आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या चर्चेवर आज खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून केली होती. आमचं ठरलंय, तुम्ही चिंता करू नका, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केले.

युती करण्याची भावना महत्वाची आहे. देशात अनेक राज्यात युती आणि आघाडी झाली. मात्र आज त्यांची अवस्था काय आहे हे समोर आहे, असे ते म्हणाले.

राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात, मात्र आपण आता एकसाथ दौडायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या विजयानंतर शिवसेनेचेच नव्हे तर भाजपचे खासदार देखील भेटायला आले होते. हा एकोपा असला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता ही माती होऊन द्यायची नाही, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि खासदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की,  संघर्षाच्या वेळेला मला शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही कारण त्यांनी मला असे सवंगडी दिले आहेत. मात्र अशा आनंदाच्या क्षणी शिवसेनाप्रमुखांची आठवण येते. त्या सर्व शिवसैनिकांची आठवण येते ज्यांनी शिवसेना मोठी केली.

ते म्हणाले की, शिवसैनिक प्रेम केलं तर भरभरून प्रेम करतो आणि लढायचं म्हटलं तर जीवाची बाजी लावून लढतो.

ठाकरे यावेळी म्हणाले की, युती करण्याची भावना महत्वाची आहे. राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात. मात्र आता आपण आता एकसाथ दौडू, आपण संघर्ष केल्याने विरोधकांचं फावलं असल्याचं ठाकरे म्हणाले.

यावेळी अनेक नेत्यांच्या भाजप प्रवेशावर ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे अशी काय शक्ती आहे काही माहिती नाही. आम्ही विरोधी पक्षात उतरणार होतो तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते होते तर ते देखील भाजपमध्ये आले. आता विरोधी पक्षनेते कुणाला तरी केलं आहे, तर त्यांना भाजपत घेऊ नका असे अजित पवारांनी सांगितलं आहे, असे ठाकरे म्हणाले. सगळ्यांना घ्या फक्त पवार कंपनी तिथेच राहू द्या, त्यांना घेऊ नका, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. याचा मला आनंद आहे. आपण जिंकलो याचा सर्वाधिक आनंद आहे. मला दुसऱ्यांच्या पराभवानंतर आनंद साजरा करायला आवडत नाही. मात्र सावरकरांना डरफोक म्हणणाऱ्यांना हरवलं यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले.

ओवेसी म्हणतो आम्ही या देशात भाडेकरू नाही. आम्ही समान भागीदार आहोत, तर वन्दे मातरम् म्हणायला लाज का वाटते. एवढं स्वातंत्र्य देऊनही तुमच्या मनातले किडे का वळवळतात?, असा सवाल ठाकरेंनी केला.

मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावलं तर तुमच्या पोटात का दुखतंय, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.  याआधीही ही परंपरा होती. भाजपचा अधिवेशनात शिवसेना प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तसेच अनेक भाजप नेत्यांनीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मध्यंतरी परंपरा खंडित झाली होती. मात्र  मधल्या काळातला दुरावा आता पूर्ण नाहीसा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

धिरज करळे: