ग्लोबल न्यूज- राज्य सरकारने राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये चालू वर्षापासून इयत्ता पहिली व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मराठी’ विषय सक्तीचा केला आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यातील CBSE, ICSE तसेच केंब्रिज यांच्यासह आतंरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांनाही या वर्षापासून मराठी शिकविणे सक्तीचे करण्यात आले आहे. शाळांनी या निर्णयाचे पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार त्या विभागातील उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
पहिली ते दहावी पर्यंत टप्प्याटप्प्याने होणार अमंलबजावणी
राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी
2020-22 या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी
2020-23 या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी
2020-24 या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी
2020-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी
मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी (दि.1) जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते.