… म्हणून शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला व राबवला ! – शरद पवार

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थित हा सोहळा झाला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘गेल्या 50 वर्षांत कोल्हापूर असो व अन्य कुठेही, शाहू महाराजांसंबंधी कुठलाही सोहळा असला तरी माझी उपस्थिती चुकलेली नाही. महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी मिळून आम्ही लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती यांच्याकडे संसदेच्या प्रांगणात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याकरिता पुढाकार घेतला. आज संसदेमध्ये जाताना शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊनच जाता येतं.”

ते पुढे म्हणाले की, आरक्षणासंबंधी आजही आपल्यासमोर आव्हानं असताना त्याकाळी शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आणि राबवला. कारण अख्खी पिढी शिक्षित झाली पाहिजे असा विचार त्यामागे होता. समाजाला दिशा देणारे त्यांचे नेतृत्व होते.

त्यांच्या विकासकामाचा आवाका विलक्षण होता. राधानगरी धरण त्याकाळात त्यांनी बांधण्याचा विचार केला. केवळ धरणच बांधलं नाही तर या धरणाच्या पाण्यातून विद्युत निर्मितीची तरतूद केली. वीज केवळ शेतीसाठी नाही तर शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा पाहिजे असा विचार त्यांनी केला. लोकांनी उद्योगात पडावं यासाठी धंदेवाईक शिक्षणही दिलं. कारखानदारी उभी करण्यासाठी मदत केली, त्यासाठी उद्योगनगरी स्थापन केली.

१९६२ झाली सरकारतर्फे आम्ही परदेशात अभ्यासदौऱ्याला गेलो होतो. इजिप्तमध्ये नाइल नदीच्या काठावरची शेती पाहात असताना आपल्यासारखीच ऑइल इंजिन तिथे दिसली. तिथे भेट देऊन इंजिनाची शहानिशा केली तेव्हा लक्षात आलं की ते कोल्हापुरात तयार झालेलं इंजिन होतं. भारतात परतल्यावर संबंधितांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे इंजिन आम्ही जगभरात पाठवू शकलो ही शाहू महाराजांची कृपा. कारण शाहू महाराजांनी शिक्षण दिलं, दृष्टी दिली, साधनं मिळवून दिली, जगाची बाजारपेठ आपण गाठली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचं बळ दिलं. राजकारण, समाजकारण, शिक्षण, शेती, मल्लविद्या, शिकार, उद्योग, व्यापार उदीम ते कला अशा विविध क्षेत्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उमटवलेला ठसा आजही आपल्याला दिसून येतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: