मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचे चित्र पूर्णपणे उलटले आहे. एका रात्रीत राजकारणात बदल झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत होतं. शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचे आभार मानले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यानंतर म्हणाले की, ‘मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी राज्यामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला आणि भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला. दुसरे नेतेही आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे’ असं फडणवीस म्हणाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल अशी चर्चा सुरु होती. अचानक शनिवारी सकाळी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. दरम्यान एका रात्रीत भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे.