मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये येत्या 27 जानेवारीपासून ‘नाइट लाइफ’ सुरू होत आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील या योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून बुधवारी मंजुरी मिळाली. या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं 24 तास सुरू राहणार आहेत. यामध्ये पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली आहे. तसेच नाइट लाइफमुळं पोलिसांवर कोणताही ताण येणार नसल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचंही अनिल देशमुख म्हणाले आहेत. नाइट लाइफ सुरू झाली तरी पब आणि बारला पूर्वीप्रमाणेच वेळेची मर्यादा राहणार आहेत. पब आणि बार दीड वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
‘नाइट लाइफ’ सुरू होणार असली तरी दुकानं उघडी ठेवण्याची सक्ती कोणत्याही दुकानदारावर असणार नाही. आपली इच्छा असेल तरच आपण आपले दुकान उघडे ठेवायचे आहेत. आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे.