मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत आणि ते तडकाफडकी बारामतीला निघून गेलेत, या बातमीत कोणतंही तथ्य नसून अजितदादा मुंबईतच आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आता नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार मुंबईतच असल्याचे माध्यमांना सांगितले. कॉंग्रेस -राष्ट्रवादीची बैठक सुरु असून बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थितही आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची खास बैठीला, अजित पवारही उपस्थित
हॉटेल ऑबेरॉयमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस समन्वय समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नबाव मलिक, जयंत पाटील तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित आहेत.
दरम्यान, अजित पवार आज सायंकाळी शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी गेले होते. तिथून साडेसातच्या सुमारास ते बाहेर पडले. त्यावेळी माध्यमांनी त्यांना गराडा घातला असता आजची बैठक रद्द झाली आहे. मी आता बारामतीला निघालो आहे, असे सांगून ते कारमध्ये बसून निघून गेले. त्यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. दरम्यान, अजित पवार यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. अजित पवार नाराज आहेत, असेही सांगितले जाऊ लागले. मात्र, काही वेळातच जयंत पाटील यांनी माध्यमांशी संपर्क साधून या गोंधळावर पडदा टाकला.
मी बारामतीला जात आहे, असे अजित पवार यांनी गाडीत बसताना माध्यमांना सांगितले. अजित पवार गाडीत बसताना नाराज दिसत होते. या नाराजीमागे काय कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नाते बिघडले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेे. आघाडीत बेबनाव सुरू आहे का? अशा बातम्याही प्रसार माध्यमांनी सुरू केल्या. त्यानंतर जयंत पाटील यांनी खुलासा केला. शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात ही बैठक नियोजित होती. तेथे काँग्रेसचे नेतेही पोहचले होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे सर्व नेते बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द, कोण काय म्हणालं?
– बैठक रद्द होण्यात आणि ती दुसऱ्या दिवसावर जाण्यात काहीही विशेष नाही – थोरात
– राजकारणात काही गोष्टी गुपीत ठेवायच्या असतात – आव्हाड
– बैठक रद्द झाल्याची अधिकृत माहिती मला मिळालेली नाही – अशोक चव्हाण