व्हायरस……
संदीप…..एका शेतकऱ्याचा मुलगा.गावच्या मराठी शाळेत शिकून शहरात जाऊन एम.एस्सी पर्यंत शिक्षण घेतलेला.नोकरीसाठी दोन चार ठिकाणी संदीपने प्रयत्न देखील केले. पण कुठे पैसे कमी पडत होते तर कुठे वशिल्याअभावी नोकरी पदरात पडत नव्हती.
शेवटी संदीपने नोकरीचा नाद सोडला आणि तो घरच्या शेतीकडे वळला.अनुवंशीक शेतीची जाण त्यात आधुनिक तंत्रज्ञानाची ज्ञान यामुळे संदीपला शेतीत सूर गवसला.माळरान जमीनीवर त्याने डाळींबाची बाग लावली, ठिबकद्वारे पाणी पुरवलं.आतंरपीकं म्हणून कधी कलिंगडं लावली,कधी कांदे लावले.एक दोन देशी गाई पाळल्या.संदीपची शेती पहायला आसपासच्या गावातून लोकं यायला लागली.पोपटराव पवारांच्या हस्ते संदीपला कृतीशील शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला.संदीपची डाळींबं परदेशात निर्यात व्हायला लागली.
एकीकडे संदीपचा मळा फुलत होता तर दुसरीकडे त्याचे आई-वडील त्याच्या मळ्याला मळेवाली आणण्याचा विचार करत होते.आई-वडील आडूनपाडून तसे बोलत होते. पण संदीपच्या मनात काही वेगळेच होते.
संदीपच्या नात्यात एक मुलगी होती,स्मिता.गोरी गोमटी ,लाघवी स्मिता त्याच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान होती.कळत्या वयापासूनच संदीपच्या मनात बसलेली.आता एम.टेक करत होती.कधी एखाद्या कार्यक्रमात ती दिसली की भान हरपून पहात रहायचा तिच्याकडे.स्मिताही झुकलेल्या पापण्यांत काही तरी लपवायची!
न राहवून एक दिवस संदीपने आईला मनातलं सांगितलंच.त्यांच्या नात्यातलं एक लग्न होतं.तिथे स्मिताचे आई वडील येणार होते.संदीपने आईला गळ घातली की स्मिताच्या आईकडे विषय काढ म्हणून.पाहुण्यांच्या गराड्यातून संदीपच्या आईने स्मिताच्या आईला बाजूला घेतलं.
हळू आवाजात स्मिताच्या आईला म्हणाली,"वहिनी,स्मिताचं शिक्षण पुर्ण होत आलंय ना! आम्ही संदीपच्या लग्नाचा विचार करतोय.तुम्ही म्हणत असाल तर स्मिता आणि संदीपचं......"
तिचं वाक्यही पुर्ण न होऊ देता स्मिताची आई मोठ्याने म्हणाली,"बया,बया,बया..... काय म्हणावं आता लोकांना, पायरी पाहून तरी बोलावं! डाळींबाच्या चार पेट्या काय निघाल्या तर लागलेत आभाळाला हात लावायला.यांच्या शेतकरी पोराला आमची स्मिता देऊन काय तिला शेण भरायला लावायचं? आम्ही जावई म्हणून फाॅरेनचा मुलगा पाहणार आहोत.लागलेत स्मिताला मागणी घालायला." तिच्या मोठ्या आवाजाने आजुबाजूच्या सगळ्या स्त्रिया त्यांच्याकडे पाहून हसत होत्या.
संदीपच्या आईला अगदी कानकोंड्यासारखं झालं होतं.लग्न लागल्यावर न जेवताच आई घरी आली.घरी आली तरी तिच्या डोळ्यातल्या धारा थांबत नव्हत्या.संदीपला काही न सांगताच सगळं समजलं होतं.मनाची समजूत काढून तो शेतीच्या कामात लक्ष घालत होता. पण अधूनमधून स्मिताचा चेहरा समोर यायचाच.
काही दिवस गेले.स्मिताच्या आई -वडिलांना स्मितासाठी त्यांना हवं तसं स्थळ मिळालं.सुबोध अमेरिकेच्या आय.टी.कंपनीत जाॅब करत होता.डाॅलरमध्ये पगार होता.मे महिन्यात सुबोध भारतात आला की साखरपुडा करण्याचं ठरवलं होतं.संदीपच्या कानावर या गोष्टी आल्या.डोळ्यातलं पाणी गालावर येऊ न देता त्याने ते आतल्या आत गिळलं.डाळीबांच्या पेट्या पॅक करता करता हलकेच हसू त्याच्या चेहऱ्यावर तरळलं.न जाणो यातलीच एखादी पेटी कधीतरी अमेरिकेत स्मिताच्या घरी जाईल.
दिवसामागून दिवस पुढे पुढे जात होते.......
मागच्याच आठवड्यात सुबोध भारतात आला होता,हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन.
काल सकाळी सकाळी संदीपच्या आईचा फोन वाजला.पलिकडून स्मिताची आई बोलत होती,"शोभाताई, एवढं कोरोनाचं संपलं की संदीप आणि स्मिताच्या लग्नाची बोलणी करायची का?"
संदीपच्या आईच्या डोक्यात अचानक एक कळ उठली...... माणसांच्या मनातले व्हायरस घालवायला खरंच अशा व्हायरसांची गरज असते का?
Copy right-मनिषा गायकवाड / पटेकर
राहुरी
कथा आवडल्यास नावासहीत शेअर करा.