माझ्या काळात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर भाजप पहिल्या क्रमांकावर ;रावसाहेब दानवे

ग्लोबल न्युज मराठी : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतुन मुक्त करत त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे फेसबुकववर पोस्ट करून आभार मानले आहेत.

अशी आहे दानवे यांची पोस्ट

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी आभारी असून या कालावधीत भाजपाला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो.

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांनी 6 जानेवारी 2015 रोजी माझी प्रथम भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्ष संघटनेची जबाबदारी मी स्वीकारली होती. त्यानंतर 18 जानेवारी 2016 रोजी पक्षांतर्गत निवडणुकीत एकमताने व बिनविरोध प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यामुळे आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

माझ्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत भाजपा महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती अशा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 23 जागा जिंकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्याला पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या परीश्रमामुळे भाजपाला पंचायत ते पार्लमेंट या सर्व पातळ्यांवर निवडणुकीत पहिला क्रमांक मिळाला. राज्यातील तिसऱ्या व चौथ्या स्थानावरून पक्षाने झेप घेतली. त्यासोबत पक्षाचा संघटनात्मकदृष्ट्या प्रचंड विस्तार झाला. समाजाच्या सर्व घटकातील लोक भाजपाशी जोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपाच्या केंद्र सरकारचे काम, मा. अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे काम यामुळे भाजपाला यश मिळाले. भाजपाला यशस्वी करणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. या सर्व काळात राज्यातील जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिला, त्यांचाही मी आभारी आहे.

आपला
रावसाहेब पाटील-दानवे

ग्लोबल न्युज नेटवर्क: