मुंबई:महाराष्ट्रात शिवसेनाबरोबर आघाडी आणि किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज (बुधवार) बैठक होणार आहे. ही बैठक मंगळवारी होणार होती. परंतु, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ही बैठक स्थगित करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली.
काँग्रेस अध्यक्षांच्या बैठकीत पक्षाचे नेते ए के अँटनी, अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. शिवसेनेबरोबर आघाडी करणे हा एक मोठा निर्णय आहे. त्यामुळे, आघाडीपूर्वी सर्व मुद्द्यांवर सहमती आवश्यक आहे, असे पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
चोवीस तासांत संजय राऊतांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट
काँग्रेस आणि शिवसेनेदरम्यान अनेक मुद्द्यांवर वेगवेगळे विचार आहेत. यामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी, नागरिकता दुरुस्ती कायद्यांचा समावेश आहे. काँग्रेसचा प्रयत्न हा या सर्व मुद्द्यांचा समावेश किमान समान कार्यक्रमात व्हावा, असा आहे. याचदरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा भेट घेतली.
शिवसेनेने बोलावली आमदारांची बैठक
सरकार स्थापन करण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचाली पाहता शिवसेनेने २२ नोव्हेंबरला आपल्या सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करतील. यामध्ये राज्य सरकार स्थापन करण्यावरुन पक्षाच्या भविष्याच्या रणनीतीवर मंथन केली जाण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.