मराठ्यांचा इतिहास : कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार, जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील देव्हारा

अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण.

या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात.

कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतिक म्हणून टाक हा पंचकोनी असतो .

पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतिक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्या साठी केला जातो त्याच प्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतिक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ट भागा साठी केला जातो.मुखभाग व पृष्टभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ /लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो.

देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते, ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात.

प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल,ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वचघरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात.

काही परिवारा मध्ये पूर्वज [ पितर] यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या,अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते, एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मुळ निवास, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो, त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संख्येत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे, आपल्या देव घरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे.

जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी ) –

जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातले त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे.ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते.थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे.

चैत्र महिन्यात ग्रामदैवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्राम्दैवातला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे.

लक्ष्मीदेवी –

ऋग्वेदात असलेली श्री किवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मीदेवी यात साम्य असले तरीही ही तीच रुग्वैदिक लक्ष्मी नाही. बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात. लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे. तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी धन संपत्तीचे रक्षण करते.
पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत. नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली.

पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रोत दुषित होत असत व आजार पसरत असे. त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता. ह्या देवीला मरीआई, महामारी, कडकलक्ष्मी असेही संबोधले जाते. आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पिक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते.

म्हसोबा –

हा परिचित देव असला तरीही बराच गूढ असा देव आहे. ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा!

आता आपण टाकाचे निरीक्षण करू. यात एक रेडा दर्शविला आहे. हा रेडा म्हणजेच महिष! महिष म्हणजेच महेश! म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे. आता थोडे पुराण कथेकडे वळू.

देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले. चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता. शेतकी जीवनात पशूचे महत्व खूप आहे. म्हसोबा हा खरेतर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते.म्हसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो. त्याचे ठराविक क्षेत्र असते. त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे. म्हसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो. म्हसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे. म्हैस, सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव-शंकर असल्याचेच पुरावे आहेत.

खंडोबा –

हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत. तरीही खंडोबाचा काळ व इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे. खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो. कारण शेळ्या-मेंढ्या, लोकर, धनगर, कुत्रा ह्यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे. जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्याकाळातील इतिहासाशी ह्या बाबी संबंधित आहेत.जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे. तर पालीचा (किवा इतर ठिकाणचे) खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो.

आता आपण टाकाचे निरीक्षण करू. टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश आहे. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्ठीला उठतो.

तसेच सोमवती अमावास्या, श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात. भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकारिता वापरला जातो. त्यामुळे पतीपत्नी यांनी स्वच्छ, सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो.

महिषासुरमर्दिनी –

हा टाक सर्वत्र आढळतो. स्त्रीसात्तक व मातृपुजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे.ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी.

देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे. याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो. महिषासुर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे. देवीची अनेक रूपे आहेत. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पुजली जाते.

तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती, जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते. लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले. तरीही आपले कुलदैवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात.

पुढे कोल्हापूर, वणी, अंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला. पण पूर्वी चार किवा आठ हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी असल्याचे दिसून येते. अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे. जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाहविधीच आहेत. आता वाजतगाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले. विवाह विधीत त्यामुळे अमुलाग्र बदल घडला आहे. आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गम्मत आहे.

देवांचा रक्षक अर्थात वीर –

मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप. हा बरेचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्य-बाण धारण केलेला असतो. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र हा आपले व देवांचे रक्षण करते असा अर्थ निघतो. घरातील भांडी-कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात. चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो.

तर असे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत. याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाक आढळतात. ते खालीलप्रमाणे,

१) बनेश्वरी-वनशंकरी – समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी.
२) काळूबाई- फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला.
३) अन्नपूर्णा- हातात पळी घेतलेली.
४) महिषासुरमर्दिनी- अष्टभुजा स्वरूपातील.
५) रेणुका- फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट.
६) एकविरा-फक्त मुखवटा, एक बाण, व मोठे गोटे डोंगराचे प्रतिक.
७) अंबेजोगाई- फक्त मुखवटा, अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली.
८) अष्टभुजा सिन्हावरची.
९) यल्लम्मा- दहा हात व डोक्यामागे चक्र.
१०) जोखाई- जानाई सारखीच फक्त कणीस व मुल बरोबर नसते.
११) लक्ष्मी – मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना.
१२) ज्योतिबा- घोड्यावर स्वार, समोरून व हातात तलवार.
१३) नवनाथ- ९ देव.
१४) मुंजोबा- उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी.
१५) भैरोबा – घोड्यावर एकटा व हातात तलवार.
१६) अष्टभुजा वाघावारची वाघजाई.
१७) वीर- धनुष्य-बाणधारी
१८) गणपती.
१९) शिव पार्वती.
२०) वणी सप्तशृंगी १८ हात असलेली.
२१) औंधची देवी.
२२) घोड्यावरची देवी.
२३) कोल्हापूरची महालक्ष्मी
२४) माता-पिता
२५) साती आसरा- सात देवी व मगर किवा पशु.
२६)चंद्रसेन उर्फ चदोबा घोड्यावर व हातांत तलवार
उजव्या बाजूस जानाई व डाव्याबाजूस जोगेश्वरी

देवघरातील टाकांची देखभाल :

देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात, ओला गंध लावू नये.
दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.

टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये.
सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.

देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.

टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावरखाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.आपण आपल्या देव घरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील.

अत्यंत महत्वाचे कृपया नोंद घ्यावी –
आपल्या घरातील टाक तपासणी करून पाहावे कोणत्या टाक्यात पाणी मुरत असेल तर सदर टाक लवकरात लवकर बदलून घ्या .

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: