धीरज करळे
ग्लोबल न्युज नेटवर्क; उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी उस्मानाबाद चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, यांच्याकडे करत होते, त्यानुसार बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाडयातील ७ प्रकल्पासाठी रु. ३३८०. ८९ कोटी नाबार्ड कडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.
या मंजुरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले व शरद पवारांचे विश्वासू व नातेवाईक असलेले राणा पाटील यांनी फेसबुक पोस्ट द्वारे भाजपच्या मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. या पोस्ट मध्ये त्यांचा एकट्याचा फोटो वापरण्यात आल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.
हीच ती पोस्ट जशीच्या तशी
त्याचप्रमाणे प्रत्येक अधिवेशनामध्ये या प्रकल्पाची गरज विषद करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी करत होतो. मागील महिन्यातच मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना भेटून या प्रकल्पाबाबत बैठक घेवून योजनेतील अडथळे दूर करण्याची व या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे दरवर्षी रु. १२०० कोटी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाडयातील ७ प्रकल्पासाठी रु. ३३८०. ८९ कोटी नाबार्ड कडून कर्ज घेण्याच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.
जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्त्या रोखण्यासाठी व येथील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. आज मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील ५२ पाटबंधारे प्रकल्पासाठी रु. १५००० कोटीचे कर्ज घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये मराठवाडयातील ७ प्रकल्पासाठी रु. ३३८०. ८९ कोटी प्रस्तावीत करण्यात आले आहेत. कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्प लिंक-५ साठी रु. ८७० कोटी तर कृष्णा-मराठवाडा पाटबंधारे प्रकल्प उपसा सिचंन योजना १, २ व ३ साठी रु. २३०२ कोटी तर इतर साठवण तलाव व अनुषंगीक कामासाठी रु. २०८ कोटी प्रस्तावीत करण्यात आले आहेत.
सदर कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जलसंपदा विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग वित्तीय संस्था निश्चित करणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थीती पाहता या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने या प्रकल्पाचे अनन्य साधारण महत्व आहे. डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी मराठवाडयाच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मंजूर करुन घेतले होते. परंतु या प्रकल्पासाठी शासनाकडून अत्यल्प निधी दिला जात होता. भरीव निधीच्या तरतूदीसह कालमर्यादा ठरवून हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी राज्याच्या महामहीम राज्यपाल यांची देखील शिष्टमंडळासह भेट घेतली होती.
सरकारला जिल्ह्यातील १ लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन दिले होते. विधीमंडळ, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री यांच्या स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश आले आहे. उजनी उद्भव पाणी पुरवठा योजना, खरीप २०१७ मधील उस्मानाबाद व लोहारा तालुक्यांना मंजूर करुन घेतलेला पीक विमा, २१ टीएमसी साठी आज मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय यासारखी मोठी कामे केवळ सततच्या पाठपुराव्या मुळे होवू शकतात हे पून्हा एकदा सिध्द झाले आहे. या उपर देखील या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा अधिकचा निधी राज्य शासनासह केंद्र शासनाकडून मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरुच राहणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती मिळणार असून तो लवकर पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.यामुळे या भागातील लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.परिणामी याभागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व जलसंपदा मंत्री मा.गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाच्या यादीत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महत्वाचा असणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प समाविष्ट केल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार !