भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झालं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी आज (सोमवार) रात्री ९ वाजता राजभवनमध्ये चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
यापूर्वी सोमवारी सायंकाळी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शपथ घेतली. पण यावेळी फक्त एकट्या शिवराजसिंह चौहान यांनीच शपथ घेतली. त्यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळातील अन्य कोणत्याही सदस्याने शपथ घेतली नाही.
शपथ घेतल्यानंतर शिवराजसिंह म्हणाले की, ‘शपथ घेतल्यानंतर सहसा असे घडते की मी ज्येष्ठांच्या पाया पडतो. पण आज तसे घडले नाही कारण कोरोना व्हायरस हा साथीचा रोग आपल्या अवतीभवती पसरला आहे.’ ते पुढे असंही म्हणाले की, ‘कोरोनाशी लढा देणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे. म्हणून मी तुमचे सर्वांनी आणलेली फुलांचा गुच्छ स्वीकारु शकत नाही. त्यामुळे फक्त हात जोडून तुमचे सर्वांचे आभार मानतो.’
शिवराज यांचे आव्हान
शिवराजसिंह यांच्या समोर मोठे आव्हान आहे की यावेळी कोरोना व्हायरसच्या धोक्याचा सामना करणं हे आहे. मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या सहा घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशातील ३५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाऊन कालावधी ३ एप्रिलपर्यंत असून बहुतांश जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
या जिल्ह्यात लॉकडाऊन आहे
राजधानी भोपाळ, सीहोर, शाजापूर, अगर-मालवा, रीवा, शिवपुरी, कटनी, भिंड, शहडोल, अलीराजपूर, देवास, नीमच, सिंगरौली, गुना, रतलाम, मंडला, मंदसौर, बालाघाट, सिवनी, उज्जैन, श्योपुर, झाबुआ, जबलपूर, टीकमगड , दिंडोरी, नरसिंगपूर, छिंदवाडा, बैतूल, रायसेन, राजगड, छतरपूर, ग्वाल्हेर, दतिया, मुरैना, विदिशा, उमरिया, होशंगाबाद, अनूपपूर आणि अशोक नगर येथे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.