मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी पार पडला. सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उत्साहात पार पडला. एकूण 36 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 10 राज्यमंत्री तर एक उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेंनीही शपथ घेतली आहे. दरम्यान कर्जतचे आमदार रोहित पवारांनाही मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. यानंतर आता रोहित पवारांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी व्यक्तिगत नाराज नाही. ज्यांनी-ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्या मतदारसंघातून निवडून येतो तेथील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या त्यांनी त्या बोलून दाखवल्या आहेत .त्यांचे मी आभार मानतो पण माझी कुठलीही नाराजी नाही. शेवटी मतदारसंघांमध्ये काम करायचे आहे त्यांचे प्रश्न सोडवायचे आहे त्या त्यासाठी प्रयत्न करत आहे आमदाराची ताकत कमी नसते. मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करायचे असतात त्यामुळे मी कुठे नाराज नाही.
यासोबतच फेसबुक पोस्ट करत त्यांनी मंत्रीमंडळात समावेश झालेल्या सर्व मंत्र्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. रोहित पवार म्हणाले की, “जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण दिलेली ही जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी पार पाडतील असं मला वाटतं. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्जत जामखेड या माझ्या मतदारसंघातील मतदार तसेच पक्षातील जेष्ठांपर्यन्त प्रत्येकास माझा समावेश मंत्रीमंडळात असावा अस वाटतं होतं. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
आपण ज्यांना आदरार्थी मानतो अशा जेष्ठांनी दिलेला सल्ला नेहमीच अंतीम असेल मात्र लाथ मारेल तिथे पाणी काढून दाखवण्याची क्षमता ठेवूनच मी आजवर काम करत असून इथून पुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच दुप्पट वेगाने कार्यरत राहिलं .आजवर मला मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत रहात आपला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेल.
सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून मतदारसंघासोबतच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेवून कार्यरत राहील. पुन्हा एकदा नवनियुक्त मंत्रीमंडळाचे विशेषत: ज्या युवक प्रतिनिधींना ही संधी मिळाली त्यांचे हार्दिक अभिनंदन.”