खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागातील १५ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. प्राप्तिकर विभागातील अक्षम आणि संशयास्पद अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच दिले होते. त्याच आधारावर सरकारने ही कारवाई केली आहे. गेल्या तीन टप्प्यांमध्ये कर विभागातील ४९ अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातील १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर शुक्रवारी भूतानमध्ये कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हेलिकॉप्टर लष्करी कामासाठी अरुणाचल प्रदेशमधील खिरमू येथून भूतानमधील योंगफुल्ला येथे निघाले होते. मृतांमध्ये एक भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल श्रेणीच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर भूतानमधील एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली आहे. हाच भाजपचा न्याय आहे का? असा प्रश्न त्यांनी यागी आदित्यानाथ यांना विचारला आहे. शहाजहापूर बलात्कार प्रकरणाबरोबरच उन्नाव बलात्कार प्रकरणातही त्यांनी योगी सरकरावर हल्ला चढवला.
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या अटकेत असलेले माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आपण कधीही इंद्राणी मुखर्जी यांची भेट घेतली नसल्याचे म्हटले आहे. इंद्राणी मुखर्जी या आयएनएक्स मीडियाच्या सहसंस्थापक होत्या. या प्रकरणात त्या माफीच्या साक्षीदार झाल्या असून, चिदंबरम यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे त्यांनी समर्थन केले आहे. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी चिदंबरम यांनी इंद्राणी मुखर्जींना भेटलो नसल्याचे सांगितले.
जोधपूर : राजस्थानमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारी १च्या सुमारास हा अपघात झाला. जैसलमेर – जोधपूर रस्त्यावर हा अपघात झाला. जैसलमेरहून आगोलाईला जाणारी एक मिनी बस आणि आगोलाईहून जैसलमेरला जाणारी बोलेरो गाडी यामध्ये अपघात झाला.
अपघातात १३ लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी तीन लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला, ९ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आणखी दहा जखमींवर जोधपूरच्या मथुरादास माथुर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे : कालपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राजीनामा का दिला? यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पवारांनी दिलेला राजीनामा कोणालाही माहित नसल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पुणे : अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्या बाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे. अजित पवार यांनी राजीनामा देण्यासंदर्भात चर्चा केली नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांचा सहकारी बँकेशी संबंध नाही, अशा शरद पवार यांचेही यात नाव आल्याने अस्वस्थतेतून राजीनामा दिल्याचे शरद पवार यांनी पुण्यात सांगितले.
इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेले प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे आज रयत क्रांती संघटनेत प्रवेश करणार आहेत. संघटनेचे संस्थापक आणि मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तुपकर यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव : भाजप सरकार सूडबुद्धीेने ईडीची कारवाई करतंय, असा कांगावा करणं साफ खोटं आहे. जे कराल ते भरावंच लागेल, असं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते जळगावमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. आघाडीचं सरकार असताना शरद पवार आणि अजित पवारांनी राज्य सहकारी बँकेच्या निधीचा गैरवापर केला. हा गैरव्यवहार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच उघड केला. अशा नेत्यांवर इडीने कारवाई केली. त्यात भाजपचा काय दोष? असेही रावसाहेब दानवे म्हणाले.
सोलापूर : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या संहितेची सक्त अंमलबजावणी सुरू असून तीन दिवसात शहर व जिल्ह्यातील 16 हजार बॅनर, सहकाऱ्यांना होर्डिंग काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावर प्रचार बंदी नाही पण उमेदवारी दाखल केल्यानंतर संबंधित उमेदवारावर त्याचा खर्च पडणार आहे. त्यासंदर्भात आजपर्यंत सात गुन्हे दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अर्ज वाटप व स्वीकारण्यास कालपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी पहिल्या दिवशी 277 उमेदवारी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट 1, पंढरपूर 1 अशा दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. करमाळा 16, माढा9, मोहोळ 14, शहर उत्तर 19, शहर मध्ये 35, अक्कलकोट 22, दक्षीण सोलापूर 37, पंढरपूर 36, सांगोला 40, माळशिरस 19 असे एकूण 194 इच्छुक उमेदवारांनी 277 अर्ज नेले आहेत.
सोलापूर: शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 35 उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम, भारतीय जनता पार्टीचे नागेश वल्याळ, एमआयएमचे फारुक शाब्दी यांच्याकरिता उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया पासून सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 27 35 अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
सोलापूर: केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक प्लास्टिक बंदीसाठी संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, 1ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालयपासून सर्व स्तरावर जनजागृती, 2 ऑक्टोबरला श्रमदान आणि 3 ते 27 ऑक्टोबर जमा केलेले प्लास्टिक विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी सांगितले. एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकवर मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे, मनपा उपायुक्त अजयसिंह पवार उपस्थित होते.
अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदार संघासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पंधरा जणांनी बावीस अर्ज नेले. त्यापैकी एक अर्ज दाखल झाले आहे. नुकत्याच लोकसभा निवडणूक अडविलेले व्यंकटेश महास्वामी तथा दीपक गंगाधर कटकधोंड यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. पितृपंधरवडा असल्याने अद्याप तालुक्यातील विविध पक्षाकडून हिची कसलेल्या कडून केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.