‘भोंगा वाजलाय, सायरन झालाय… वॉर अगेन्स्ट व्हायरस अर्थात कोरोनाविरुद्ध युद्ध सुरू झालंय’ असे ऐलानच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले. ‘युद्धात सैनिक तळहातावर प्राण घेऊन लढतात तसेच कोरोनाविरुद्धच्या या युद्धात आपले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉइज, पोलीस, बेस्ट-एसटी ड्रायव्हर्स, स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा हे एखाद्या वीराप्रमाणे घरदार, कुटुंब आणि जिवाची पर्वा न करता लढताहेत. हे सर्व 24 तास आपल्यासाठी लढताहेत. मग तुम्ही 24 तास घरी राहून त्यांना मदत नाही करू शकत का? असा सवाल करतानाच धर्म, जात, भेदाभेद विसरून एकजुटीने या संकटाचा मुकाबला करू… लढू आणि जिंकू,’ असा दुर्दम्य आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तवाहिन्या, फेसबुक, यू टय़ूबच्या माध्यमातून दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. ‘‘महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र…’’ अशी साद घालत उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘गेले काही दिवस एक जागतिक युद्ध हे जग आणि आपला देश लढत आहे. हे युद्ध आहे आणि या युद्धात तुमचं सहकार्य हे या सरकारचं बळ आहे. तीच आपली ताकद आहे. या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार आणि यंत्रणा सज्ज आहे.
पण यंत्रणा आणि यंत्र यातला फरक लक्षात घ्या. ही यंत्रणा सज्ज आहे म्हटल्यानंतर डॉक्टर्स, सिस्टर्स, वॉर्डबाइज, औषधं, त्याचप्रमाणे कॉरंटाइन आणि आयसोलेशनची सुविधा, व्हेंटिलेटर्स वगैरे ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टी आपल्याकडे पुरेशा आहेत. एवढंच नाही तर आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेसा असून घाबरण्याचं कारण नाही,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त केले.
डॉक्टर्स, सिस्टर्स 24 तास वीरांप्रमाणे ‘कोरोना’शी लढताहेत
घाबरून किंवा भीतीने युद्ध जिंकलं जात नाही. युद्ध जिद्दीनेच जिंकावं लागते, हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी 65 व 71 सालच्या युद्धाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. अनेक जवान लढताना देशासाठी धारातीर्थी पडतात. तेव्हा संध्याकाळी सायरन वाजला रे वाजला की पळापळ व्हायची. जिथे आडोसा मिळेल तिथे लोक आसरा घ्यायचे. दिवे बंद व्हायचे, घराच्या खिडक्यांना काळे कागद लावून आतला प्रकाश बाहेर जाणार नाही इतकी काळजी घेतली जायची.
हे जरी कुणाला आवडणारं नव्हतं तरी केवळ शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये म्हणून ही काळजी घेतली जात होती. तेव्हा जवानांनी मुंबईपर्यंत आलेली शत्रूची विमानं पराक्रमाने परतवून लावली. अगदी त्याप्रमाणेच आता कोरोना विषाणूंशी युद्ध सुरू आहे. वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरू झालं आहे. हे युद्ध लढत असताना ज्या सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत त्या सूचना तुम्ही पाळाव्यात ही माझी तुम्हाला विनंती आहे. भोंगा, सायरन वाजला आहे. युद्ध सुरू झालेलं आहे. सीमेवर जसे जवान लढत असतात तसेच आपले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉइज, आपली पोलीस यंत्रणा, बेस्ट तसेच एसटी बसचे ड्रायव्हर, स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा वीरासारखे आपलं घरदार कुटुंबाची पर्वा न करता आपल्यासाठी लढत आहेत.
ज्या वेळी तुम्हाला सांगितलं जातं की घराबाहेर पडू नका, अनावश्यक प्रवास करू नका… त्याच वेळी हे डॉक्टर्स तसेच अन्य यंत्रणा आपलं सर्वकाही विसरून 24 तास आपल्यासाठी लढत आहेत. जर हे सर्व ते आपल्यासाठी करत असतील तर आपण त्यांना मदत करण्यासाठी आपल्या घरात राहू शकत नाही का, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला.
गर्दी पूर्णपणे कमी व्हायला हवी!
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी तुम्हाला गर्दी टाळा असे आवाहन केल्यानंतर मला एक समाधान आहे की, सर्व धार्मिक स्थळं, मंदिरं, मशिदी, दर्गे, चर्चेस या सर्वांनी आपली दर्शने बंद केली. पूजाअर्चा जरी चालू असली तरी धार्मिक यात्रा, जत्रा, राजकीय कार्यक्रम, क्रीडा यासारखे कार्यक्रम आपण रद्द केले आहेत. मात्र अनावश्यक प्रवास तरीदेखील होतोय. ट्रेन, बसची गर्दी ओसरलीय, पण ती गर्दी पूर्णपणे कमी व्हायला हवी, असे आवाहन करतानाच रेल्वे, बस बंद करण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकतं. पण तिथपर्यंत जाण्याची सरकारला इच्छा नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बाहेरून येणारे लोक आपलीच माणसं आहेत…
विषाणू एकएक पाऊल पुढे टाकत आहे. समाधानाची गोष्ट जरी असली तरी ती काळजीची गोष्ट नाही असं म्हणता येणार नाही. कारण आपल्याकडे जे रुग्ण आहेत ते जवळजवळ सर्वच बाहेरून आलेले आहेत. फारच कमी रुग्ण असे आहेत की बाहेरून आलेल्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाने ग्रासलं आहे. कालच मी सिंगापूरच्या विमानतळावर अडकलेल्या पर्यटकांशी बोललो. त्यांना इथे यायचं आहे. बाहेरून जे लोक येत आहेत. ती आपलीच लोकं आहेत. घाबरूजाऊन चालणार नाही, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी परदेशात अडकलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दिलासा दिला.
शासकीय कार्यालये एक दिवसाआड, आठवडाआड हाही निर्णय होऊ शकतो
मी कालच निर्णय घेऊन शासकीय कार्यालयांत 50 टक्क्यांची उपस्थिती करण्यात आली आहे. यापुढे कदाचित एक दिवसाआड किंवा आठवडाआड हाही निर्णय घेता येईल. त्यामुळे अत्यावश्यक बाबी वगळता अन्य दुकाने बंद ठेवावीत, खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’लाच प्राधान्य द्यावं, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
जवानांप्रमाणे लढणाऱ्या यंत्रणेवरचा भार कमी करा
जवानांप्रमाणे लढणाऱया यंत्रणेवरचा भार कमी करणं आपलं काम आहे. ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्यांची कार्यक्षमता वाढवणं आपल्या हातात आहे. तीसुद्धा माणसंच आहेत, तीसुद्धा कुणाच्या ना कुणाच्या कुटुंबातील आहेत. कळत-नकळत त्यांच्या मनात चिंता आहे. पण ते चिंता दूर ठेवून आपल्यासाठी काम करीत आहे. कृपा करून ज्या ज्या सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत त्या आणि तेवढय़ाच पाळा. अन्य कोणी काही सांगेल त्यावर सरकारने सांगितल्याशिवाय अंमलबजावणी करू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.
पंतप्रधान, आरोग्यमंत्र्यांशी चर्चा
या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान तसेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी आजदेखील पंतप्रधानांशी बोललो आहे. ज्या काही गोष्टी महाराष्ट्रात करणं आवश्यक आहे त्याबद्दल त्यांना विनंती केली आहे. एका गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकारसुद्धा आपल्याबरोबरीने या युद्धात उतरले आहे. आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याचं त्यांनी वचन दिलं आहे. चाचणीची सुविधा आपण कालपासून वाढवली आहे. ही सुविधा आणखी वाढविण्यासाठी केंद्रातल्या आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनीसुद्धा चिंता करू नका, आपण हे सर्व करणार आहोत, असं आश्वासन दिले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
परदेशातून आल्यानंतर सुरक्षित राहा, आपला देशही सुरक्षित ठेवा!
परदेशातून येणारे लोक कुणाचे तरी ते नातेवाईक आहेत, ओळखीचे आहेत. पण ज्यांच्या संपर्कात ही लोकं आहेत त्यांना फोन करून सांगा की आपण जरूर या; पण हे परदेशी संकट आहे, आपण तिथून इथे आल्यानंतर स्वतः सुरक्षित राहाच, पण हे आपलं घरदेखील सुरक्षित ठेवा. ज्या सूचना दिल्या आहेत त्या कृपा करून पाळा! असं लक्षात आलं आहे की, कळत- नकळत जर कुणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल तर ती व्यक्ती अपराधी नाही. पण हातावर स्टॅम्प मारलेली लोकं इकडेतिकडे फिरायला लागतात. आपल्या प्रवासाची ट्रव्हल हिस्ट्री लपवतात. अशा प्रकारे कळत नकळत रोगाचा प्रसार करणं हे चूक आहे, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले. जी सगळी लोकं येणार आहेत त्यांना ‘क्वॉरंटाइन’ करत आहोत. दुर्दैवाने तशीच लक्षणं आढळली तर त्यांच्यासाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिवरायांचा महाराष्ट्र संकटावर मात करेल
मी सर्वधर्मीयांना विनंती करतो. आपत्ती ही आपत्ती आहे. हे संकट जातपात धर्म ओळखत नाही. हे संकटाचा सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. जसं चीनने या संकटाचा सर्वात पहिल्यांदा सामना सुरू केला. त्याप्रमाणेच कदाचित चीन हा पहिला देश आहे जो या संकटातून बाहेर पडला. आपल्यालासुद्धा बाहेर पडायचं आहे म्हणून आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण सर्व मिळून एकजुटीने या संकटातून बाहेर पडू, असे आवाहन करतानाच शिवरायांचा हा महाराष्ट्र या संकटावर मात केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
- धार्मिक स्थळं बंद झाली, धार्मिक यात्रा, जत्रा, राजकीय कार्यक्रम, क्रीडा यासारखे कार्यक्रम आपण रद्द केले आहेत. मात्र अनावश्यक प्रवास तरीदेखील होतोय. ट्रेन, बसची गर्दी ओसरलीय, पण ती गर्दी पूर्णपणे कमी व्हायला हवी.
- शासकीय कार्यालयांत 50 टक्क्यांची उपस्थिती करण्यात आली आहे. यापुढे कदाचित एक दिवसाआड किंवा आठवडाआड हाही निर्णय घेता येईल. त्यामुळे अत्यावश्यक बाबी वगळता अन्य दुकाने बंद ठेवावीत, खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’लाच प्राधान्य द्यावं.
- परदेशातून येणारे लोक हे कुणाचे तरी नातेवाईक आहेत, ओळखीचे आहेत. त्यांना सांगा की आपण जरूर या; पण आपण तिथून इथे आल्यानंतर स्वतः सुरक्षित राहाच, पण हे आपलं घरदेखील सुरक्षित ठेवा.
- कळत- नकळत जर कुणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल तर ती व्यक्ती अपराधी नाही. पण हातावर स्टॅम्प मारलेली लोकं इकडेतिकडे फिरायला लागतात. आपल्या प्रवासाची ट्रव्हल हिस्ट्री लपवतात. अशा प्रकारे कळत नकळत रोगाचा प्रसार करणं हे चूक आहे.
काळजी करू नका! सिंगापूरमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री
वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले 58 विद्यार्थी को कोरोनामुळे सिंगापूर विमानतळावर अडकून पडले आहेत. याबाबत शिवसेनेने संसदेत जोरदार आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले. इतकेच नाही तर याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे सिंगापूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांचा हिंदुस्थानात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे-मुंबईसह देशातील 58 विद्यार्थी फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या दहशतीने हे सर्व विद्यार्थी हिंदुस्थानात येण्यासाठी निघाले. परंतु एकाच वेळी तिकीट काढलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आधी मलेशियामार्गे थेट सिंगापूर विमानतळावर नेऊन कोरेन्टाईन करण्यात आले. यासंदर्भातला व्हिडीओ व्हायरल होताच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मीरा-भाईंदरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. इतकेच नाही तर शिवसेना खासदार राजन विचारे, विनायक राऊत यांनी संसदेत आवाज उठवत केंद्रीय परराष्ट्रमंत्री पी. व्ही. मुरलीधरराव, राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांचे लक्ष वेधले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांशी बुधवारी रात्रीपासून युवा सेनेचे पालघर जिल्हा विस्तारक राहुल लोंढे संपर्क साधून होते. त्यांना बार्ंडग पासेसदेखील देण्यात आले आहेत. शिवसेनेच्या या सामाजिक बांधिलकीचे या विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे.