आमच्यातून भाजपमध्ये गेलेले आमदार आणि अपक्ष आमदार असे 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्ही मेगाभरती करणार नाही, मात्र पात्रतेचा विचार करू असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. भाजपची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी असल्याने त्यांच्याबरोबर जाण्याचा विचारदेखील करू शकत नाही असा निर्वाळादेखील पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदी बागेतील घरी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, जीतेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
राज्यात सत्तास्थापनेसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. विदर्भातील ओला दुष्काळ दौरा आटोपल्यानंतर पुण्यात पवारांनी सत्तास्थापनेबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. बैठकीच्या अगोदर जयंत पाटील म्हणाले, भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत, मात्र आम्ही मेगाभरती करणार नाही तर निकषांवर भरती केली जाईल. यापूर्वी स्थानिक लोकांना आणि तरुण कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. भाजपची विचारधारा आणि आमची विचारधारा पूर्ण वेगळी आहे. आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा कधीही विचार करू शकत नाही.जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार आहोत. स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असून त्याच्या चर्चा सुरू आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi