मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी मेगाभरतीचा अनुभव घेतल्यानंतर भाजपला आता मेगागळतीचा अनुभवही घेता येणार आहे. कारण कॉंगेस – राष्ट्रवादीमधून पक्षांतर करून आलेले आमदार आता पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सत्तापालट होताचं भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. पक्ष बदलण्याचे टायमिंग चुकलेल्या या आमदारांची राजीनामे देण्याची तयारी असून ते तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात महायुतीची वर्चस्व असल्याने अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केले. या नेत्यांना भाजपने ही मोठ्या मनाने स्वीकारले. या नेत्यांना आमदारकीची तिकीट देखील देण्यात आली. यातील काही आमदार निवडणुकीत निवडूनही आले. मात्र सत्तेची फळ चाखायला गेलेल्या या आमदारांवर सत्तासंघार्षाने आणि नव्याने स्थापन झालेल्या महाविकासआघाडीने चांगलाचं घाला घातला. त्यामुळे आता हे आमदार पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.यातील बहुतांश आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.