भाजपचा शिवसेनेला 12 तासांचा अल्टिमेटम, महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?
मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष शिगेला, राज्यातील पूर्वीच्या राष्ट्रपती राजवटी
मुंबई । भाजप-शिवसेनेतील मुख्यमंत्रीपदाचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राज्याच्या राजकारणात आजची रात्र फार महत्त्वाची मानली जात आहे. सत्तास्थापनेसंदर्भात आज रात्री काही घडामोडी घडल्या नाहीत, तर महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपकडे सत्तास्थापनेसाठी आज रात्रीचा अल्टीमेटम आहे. राज्यातल्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने शिवसेनेला 12 तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची स्वबळावर सत्तास्थापनेची तयारी झाली आहे. पक्षश्रेष्ठींनीही राज्य नेतृत्वाला सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेने पाठिंबा न दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाती तयारी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. शिवेसनेने पाठिंबा दिल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असेही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील पूर्वीच्या राष्ट्रपती राजवटी
कलम 356 नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. कलम 365 नुसार एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते. राज्यात राष्ट्रपती राजवट दोन वेळा लावण्यात आली होती.
1) महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेची निवडणूक घेण्यात आली. त्या वेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.
2) महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असता दोन्ही काँग्रेसमधील वादामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे काळजीवाहू सरकार आपोआप बरखास्त झाल्याने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे. भाजपचे नेते उद्या राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत. जर त्यापूर्वी शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव आला नाही. तर भाजप सत्तास्थापनेचा दावा करु शकत नाही. त्यामुळे आजची रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्या़न, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत भाजपकडे संख्याबळ येत नाही. तोपर्यत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. त्यामुळे उद्या भाजप राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेसह संख्याबळाची सर्व माहिती देणार आहे. मुख्यमंत्री आमचा असेल असं भाजपचं ठरलं आहे. शिवसेनेसोबत तडजोड झाली तर ती फक्त मंत्रिपदाबाबत होईल. असे भाजपकडून सांगण्यात आलं आहे. तर शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड करायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून काही प्रस्ताव येतो का? यासाठी वाट बघावी लागणार आहे. जर शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव आला नाही, तर उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. तसेच भाजप राज्यपालांकडे जाऊन फक्त संख्याबळाची माहिती देईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर संख्याबळ नसेल तर सत्ता स्थापना होणार नाही आणि राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाईल असेही बोललं जात आहे.