परळी: राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज गडाच्या निमंत्रणानुसार आज भगवान गडाला भेट देऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
गडाचे दर्शन घेतल्यानंतर मुंडे म्हणाले,आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान, शक्तीपीठ म्हणजे भगवान गड ! राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी भगवानगडावर येऊन भगवानबाबांचे दर्शन घ्यावे अशी आज्ञा गडाचे मठाधिपती शास्त्री महाराजांनी मुंबई येथे येऊन दिली.
शास्त्री महाराजांची आज्ञा पाळत आज भगवानगडावर जाऊन बाबांचे दर्शन घेतले.
माझ्यासाठी हा सुवर्ण अक्षरांनी लिहण्यासारखा दिवस आहे. विरोधी पक्षनेता म्हणून गडावर दर्शनासाठी आलो होतो तेव्हा काही जणांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली होती. पण आज मला इथे दर्शनाची संधी मिळाली, भगवान बाबांनी न्याय केला ! सामान्य जनतेची, गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मला मिळो असा आशिर्वाद भगवान बाबाकडे मागितला.
या गडाचे आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे एक अभूतपूर्व नाते आहे. आज गडावर मी एक पाईक म्हणून गेलो होतो. अनेकांनी मला बाबांपासून दूर नेण्याचे ठरवले होते मात्र आज बाबांनी न्याय केला. मठाधिपती शास्त्री महाराज यांनी मला न्याय मिळवून दिला. हे गड शक्तीपीठ आहे. गडाची, मठाची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे. न मागता गडाला आम्ही गोष्टी द्यायला हव्यात आणि ते मी येत्या काळात करणार. हा गड भगवानबाबांनी निर्माण केला आहे, इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, भगवानबाबापेक्षा कोणीही मोठे नाही. धर्मकारण वेगळे आणि राजकारण वेगळे. हीच माझी श्रद्धा आहे!