मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. त्या शपथविधीविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज निर्णय देण्यात आला.
संसदीय कामात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, मात्र लोकशाही मूल्ये जपायला हवी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच भाजपला सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. अशातच आता अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या मनधरणासाठी सदानंद सुळेंनी पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे.
यानंतर देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थोड्याच वेळात तेही पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपामागून भूकंप होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. आता महाविकासआघाडीला सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाल्याचे यामुळे बोलले जात आहे.