बोलताना शब्दांचे भान नसणाऱ्या व्यक्तींमुळे नाती तुटतात!
विक्रम इंगळे
माझ्या आयुष्यात सर्वात गोड अणि सर्वात विषारी काय पाहिले असेल तर शब्द. जेवढा मधुर तेवढाच विखारी. अनेक नाती शब्दांनी जोडलेली पाहिली आहेत तसेच अनेक नाती शब्दामुळे तुटलेली पण पाहिली आहेत. अनेक जण शब्दांमुळे उद्ध्वस्त होताना पाहिलेत.
शब्दांच्या एवढे प्रभावी काहीच वाटत नाही. त्यांची शक्ति अफाट वाटते. पण हेच शब्द जपून वापरले गेले नाहीत तर होत्याच नव्हत होऊन बसतं. म्हणून मला कधीकधी वाटतं की वापरताना अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजेत.
‘तू मूर्ख आहेस’, ‘तुला काहीच जमणार नाही’ असे विखारी धारदार शब्द काही लोकांचा आत्मविश्वास कमी करतात आणि त्यांना उद्ध्वस्त करतात.
तेच जर, ‘अरे! काळजी नको, जमेल तुला’, ‘मी आहे तुझ्याबरोबर, आपण प्रयत्न करू’ असे शब्द वेदनेवर मलम लावायचे काम करतात.
शब्द बेफिकीरपणे वापरले तर संघर्ष घडवतात.
कुठल्यातरी अनोळखी नर्सचे शब्द ‘काळजी नको, सगळे सुखरुप आहे’ हे केवढा धीर देऊन जातात अणि चिंता दूर करतात.
निःशब्द शांततेतले शब्द केवढे मोठया आवाजात बोलतात.
लहान मुलांचे अर्थहीन बोबडे बोल कुणाच्या तरी खोड्या काढतात आणि हशा पिकवतात.
योग्य वेळी बोललेले शब्द वजनदार होतात अणि लोकांना भुरळ पाडून एकत्र आणतात.
उतावीळ शब्द संकटाला आमंत्रण देतात तर समजावणीचे शब्द दुःखावर फुंकर घालतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उपासनेने ह्याच शब्दांना मंत्र सामर्थ्य प्राप्त होते.
जे लोक स्वतःला सांभाळू शकत नाहीत, त्यांना त्यांचे शब्द नंतर खावे किंवा गिळावे लागतात.
आततायीपणे वापरलेले शब्द, स्वतःलाच ओशाळवाणे करतात.
निष्काळजी शब्द लाजिरवाणे करतात.
आपलेही शब्द कधीकधी वेडेवाकडे जाऊ शकतात. कुणाला बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठे बोलायचं अणि किती बोलायचं हे आपणच ठरविले पाहिजे ना!!!