बा…विठ्ठला काही चुकले असेल तर माफ कर – चंद्रकांत पाटील
पंढरपूर: गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रावर संकटांची मालिका सुरु आहे. कधी दुष्काळ तर कधी महापूर आता अतिवृष्टीमुळे सारा महाराष्ट्र हवालदील झाला असून बा…विठ्ठला आमचे काय चुकले असेल तर ते लेकरे म्हणून आम्हाला माफ कर अशी विनवणी श्रीविठ्ठलाकडे करणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी पाटील सायंकाळी पंढरीत दाखल झाले. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने भाजपा, शिवसेना महाआघाडीस स्पष्ट बहुमत दिले असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब होत आहे ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी गुरूवारी राज्यपालांना भेटून सध्य राजकीय स्थितीबाबत त्यांना अवगत केले. त्यावर भाजपाचे वरिष्ठ नेते बसून उद्या सरकार बनविण्याबाबत तोडगा काढतील.
गेली वर्षभर महाराष्ट्रावर विविध संकटांची मालिका चालू असून आधी दुष्काळ, मग महापूर व आता अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात असून याबाबत कालच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दहा हजार कोटी ही प्राथमिक स्वरुपाची मदत असून दुष्काळात ज्या आठ सवलती शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्या सर्व लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून वर्षभरात आलेल्या प्रत्येक संकटात सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणाने उभा असून या संकटात देखील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या पत्रकार परिषदे प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक व श्रीविठठ्ल रुक्मीणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतूल भोसले उपस्थित होते.
भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. परंतु नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले जात असल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
‘आम्ही कोणाचे आमदार फोडत नाही. आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. गेल्या पाच-दहा वर्षांत भारतीय जनता पक्षात जे कोणी लोक आले ते भाजपची कार्यपद्धतीन पाहून विकासाची दृष्टी पाहून आले आहेत. आम्ही कोणालाही कोणतेही आमीष दाखवले नाही कोणालाही ईडीची धमकी दिलेली नाही.’ लोकांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण जनादेश किंबहुना स्पष्ट जनादेश देऊनही सरकार स्थापनेला विलंब होत आहे. जनतेसाठीही धक्कादायक बाब आहे. यातून लवकरात लवकर काही तरी मार्ग काढावा लागले, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीविठ्ठला चुकले तर माफ कर
आज श्रीविठ्ठलापाशी आपण काय मागणार या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार स्थापनेपेक्षाही गेल्या वर्षभरात महाराष्ट्रावर संकटे आली. दुष्काळ, महापूर व अतिवृष्टीमुळे सारा महाराष्ट्र हवालदील झाला असून आमचे काय चुकले असेल तर ते लेकरे म्हणून श्रीविठ्ठलाने आम्हाला माफ करावे, अशी मागणी आपण श्रीविठ्ठला जवळ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.