बार्शी : पत्नीला परपुरुषाशी अश्लील चाळे करताना पाहिल्याने बसलेल्या जोरदार मानसिक धक्क्यामुळे आणि तिने परत मुलासमवेत मिळून मारहाण केल्यामुळे निराश झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
ही घटना बार्शी तालुक्यातील भालगाव येथे घडलीय. आत्महत्येनंतर पोलिसांच्या परस्पर अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न मयताच्या भावांनी आणि पुतण्यांनी उधळून लावला. याबाबत पुतण्या मालोजी धन्यकुमार दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलिस ठाण्यात पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मयत भालचंद्र दराडे हे आपल्या कुटुंबासमवेत वेगळे राहत होते. त्यांचे बंधू धन्यकुमार आणि शहाजी हे आपल्या कुटुंबासमवेत त्यांच्या शेजारीच राहत होते. भालचंद्र दराडे हे नेहमीप्रमाणे आपल्या दोन मुलांना घेवून सकाळी 8 वाजता शेताकडे गेले होते. ते 11 वाजता अचानक घरी परतले असता त्यांना गावातील सुभाष सोपान दराडे हा पत्नीशी अश्लील चाळे करीत असल्याचे दिसून आला. त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता हिसका देवून तो पळून गेला.
त्यानंतर नवरा-बायकोत जोरजोरात भांडण सुरु झाले. यावेळी मयत ‘ तू मला का धोका दिला’, असे म्हणत होते. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारील चुलते-पुतणे आणि इतर नातेवाईक त्यांच्या घरी गेले. त्यावेळी रडत-रडत ते मी आज हारलो, यापूर्वी देखील मी तिला मोबाईलवर अनेकवेळा सुभाष दराडेबरोबर बोलताना पाहिले आहे. आज पहाटे 6 वा. ही ती त्याच्याबरोबर बोलत होती.
त्यामुळे मला संशय आला होता. माझ्या जीवनात काय अर्थ राहिला नाही. माझ्या मनाला मनस्ताप झाला आहे. आता माझे आयुष्यात जगून काहीच फायदा नाही, असे म्हणत होते. रागाला जावून पत्नीला ‘ तू माझ्या घरात रहायचे नाही, तू मुलांना घेवून तुझ्या वडीलांकडे निघून जा, असे म्हणत होते.
त्यावेळी त्यांचा शेतातून आलेला मुलगा ऋषीकेश याने तू लोकांसमोर का सांगू न अब्रु घालू लागलायस म्हणून त्यांच्या गच्चीस धरून घरात ओढत- ओढत नेले आणि नंतर पत्नी आणि त्याने मिळून शिवीगाळ करुन मारहाण केली.
दिवसभर त्यांची भांडणे सुरु होती. त्यांनी घरातून सर्वांना बाहेर काढून कुलूप लावले. मात्र सायंकाळी गावातील लोकांनी येवून त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी घराला लावलेले कुलूप काढले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आपआपल्या घरी गेले.
राञी 10.30 च्या सुमारास फिर्यादीत गावातील लोकांनी फोन करुन भालचंद्र यांनी शेतात फाशी घेतल्याचे सांगितले.
त्यामुळे फिर्यादी आपल्या इतर नातेवाईकांसमवेत तेथे गेला. त्यावेळी त्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांना पोलिसांना कळविले का? त्यांना फासातून काढून खाली कोणी झोपविले, अशी विचारणा केली असता, त्यावेळी तेथे उपस्थित असलेला व सुभाष दराडे याचा मित्र असलेला गावातील बाबासाहेब महिपती घरबुडवे हा घरच्या लोकांची तक्रार नाही तर तुला काय करायचे आहे, तुझे तू गप्प बस आम्ही काय करायचे ते करतो, असे म्हणू लागला.
मात्र फिर्यादीने पोलिस पाटील यास तक्रार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी वैराग पोलिसांना याबाबतची माहिती दिली. याबाबत त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन दैवशाला भालचंद्र दराडे, ऋषीकेश भालचंद्र दराडे, सुभाष सोपान दराडे, बाबासाहेब महिपती घरबुडवे (सर्व रा. भालगांव ता. बार्शी ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.