बार्शीत 2 ऑगस्टपासून जयवंत बोधले महाराजांची श्रीकृष्ण चरित्र चिंतन उत्तरार्ध प्रवचनमाला
बार्शी:
श्री भगवंत देवस्थान समिती व सद्गुरु प्रभाकर बोधले महाराज भक्त मंडळाच्यावतीने श्रावणमासानिमित्त भगवंत मंदिरामध्ये ह.भ.प. अॅड. जयवंत महाराज बोधले यांच्या श्रावणमास प्रवचन मालेस शुक्रवार दि. 2 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून या वर्षी श्रीकृष्ण चरित्र चिंतन उत्तरार्ध हा विषय असणार आहे. यंदाचे प्रवचनमालेचे हे 17 वे वर्ष आहे. ही प्रवचनमाला दररोज सांयकाळी 6-30 ते 7-30 या वेळेत होणार आहे.
ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी गेल्या 16 वर्षांत संत ज्ञानेश्वराचा हरिपाठ, संत तुकाराम गाथा, संत मुक्ताईचे ताटीचे अभंग, संत एकनाथी भागवत, नारदीय भक्तीसुत्र, विष्णु सहस्त्रनाम, कर्मयोग, गोपीगीत, भक्तीयोग, दैवी संपत्ती, संत नामदेव चरित्र, ज्ञानेश्वरीतील भावकथा, आध्यात्म रामायण, संत माणकोजी महाराज चरित्र, चांगदेव पासष्ठी, श्रीकृष्ण चरित्र या विषयांवर प्रवचने दिली आहेत. बोधले महाराज यांनी विधीशाखा व तत्त्वज्ञान विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या ते ज्ञानोत्तर भक्ती या विषयावर प्रबंध लेखन करत आहेत. बोधले महाराज हे धामणगाव येथील संतश्रेष्ठ माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज आहेत. साक्षेपी सिद्धांत आणि मार्मिक दृष्टांत सांगत रसाळवाणीमध्ये प्रवचने देणार्या बोधले महाराजांचा वागयज्ञ सोहळा म्हणजे बार्शीकरांसाठी श्रवणानंदाच्या अमृतयोगाची महापर्वणीच आहे.
मागील वर्षी श्रीकृष्णाचा बालपणीचा गोकुळातील काळ व लीला हा कंस वधापर्यंतचा पूर्वार्ध सांगितला आहे. उत्तरार्धामध्ये श्रीकृष्णाचे द्वारकेतील चरित्र, द्वारका उभारणी, महाभारतातील त्यांची सामाजिक व राजकीय युगपुरुष कसा असू शकतो व त्यांची भूमिका. त्यातून तयार झालेला भागवत गीता हा ग्रंथ या विषयी सविस्तर विवेचन बोधले महाराज करणार आहेत.
यावेळी भगवंत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख, संचालक नानासाहेब सुरवसे, भारत गरड, सोमनाथ ढगे, काळे मामा आदी उपस्थित होते.