मुंबई । राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडत असल्याचं चित्र आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या 54 पैकी 42 आमदारांनीच उपस्थिती लावली. या बैठकीकडे 12 आमदार फिरकले नाहीत. पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासोबत 10 ते 11 आमदार असल्याचं पवार म्हणाले होते. त्यानुसार हे आमदार अजित पवारांसोबतच आहेत का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच या बैठकीत बंडखोर अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे, हा राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय झाला आहे, जयंत पाटील शरद पवारांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा जाहीर केला. सकाळीच अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात उपस्थिती लावली. त्यानंतर राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अभुतपूर्व नाट्यमय घडामोडींनी रंगला आहे. सत्ता स्थापनेचा हा डाव इतका इर्ष्येला पोहोचला आहे की शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला अक्षरशः उचलून आणले. आज सकाळी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनीच भाजप बरोबर सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचा मोठा गट घेऊन अजित पवार भाजपला मिळाल्याची शक्यता होती. पण, या बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शपथविधीला हजर असलेल्या 3 आमदारांना थेट पत्रकारांसमोर आणले.