मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिकडे जे बोलतात, ते होत नाही. ते म्हणाले होते की, मी पुन्हा येणार, पुन्हा येणार.. परंतु आले नाहीत. ते म्हणाले होते, राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार नाही, आता त्यांनाच विरोधी पक्षनेता व्हावे लागले. यावरून त्यांना आता अधिक देवपूजा करण्याची गरज असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी लगावला.
थोरात यांनी मंत्रालयात आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आलेल्या देवपूजेच्या विषयावर बोट ठेवत टीका केली.
फडणवीस यांना देवपूजा करून काहीही साध्य करता आले नाही. यामुळे आता त्यांनी देवपूजा करून काहीतरी वेगळे मागावे, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्षाचे आमचे हे सरकार आहे, त्यामुळे आमच्यात वादविवाद नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची चर्चा होतच असते. एखादे चार दिवस गेले तर त्यातून काही वाईट होणार नाही.
आम्ही चांगले सरकार चालवू. पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. यामुळे खातेवाटपाला वेळ तर लागणारच आहे. खातेवाटप झाल्यानंतर त्या खात्याचे काम करता येणार आहे. आढावा बैठकीत मुख्यमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नांशी चर्चा करत असल्याची माहितीही थोरात यांनी दिली.