पंढरपूर – ज्या सोलापूर जिल्ह्यात पाच वर्षापूर्वी सोलापूर शहर वगळता अन्यत्र भाजपाला फारसे स्थान नव्हते तेथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा विस्तार करत येेथे दोन खासदार , चार आमदार , महापौर भाजपाचे निवडून आणले. जिल्हा परिषदे ही समविचारी आघाडीला ताकद देत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले होते व आज ही तिच स्थिती आहे. या भागात फडणवीस रविवारी अकलूज दौर्यावर आले असताना पक्षातील जुने व नव्याने दाखल झालेल्यांनी येथे गर्दी केली होती.
अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 102 जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नुकतीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यपदाची येथे निवडणूक झाली असून यास भाजपा प्रणित समविचारी आघाडी पुन्हा सत्तेवर आली आहे व यासाठी मोहिते पाटील यांनी सहकार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा अकलूज दौरा पक्षासाठी ही उत्साहवर्धक होता.
यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते- पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज देखमुख, राम सातपुते, जयकुमार गोरे हे आमदार, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, जि. प. अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, बबनराव आवताडे, कल्याणराव काळे, शहाजी पवार, विक्रम देशमुख, विजयराज डोंगरे, राणीताई माने, अविनाश महागावकर, शोभा साठे, धैर्यशील मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवेेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली तर माळशिरसमध्ये पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले तर वेळापूरमध्ये जावून अर्धनारी नटेश्वर मंदिराला भेट दिली. अकलूजच्या सभेत बोलताना फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे या एकाच समान कार्यक्रमात हे तीन पक्ष एकत्र आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत आपल्या सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा या सरकारने लावल्याची खंत व्यक्त केली.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना केंद्राच्या माध्यमातून राबविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारने जलसंधारणाच्या कामांसाठी राज्यातील 100 मतदारसंघांची निवड केली आहे. त्यामध्ये माढ्याचा समावेश असू येथे 7 हजार कोटी रूपये खर्च केले जातील असे ते म्हणाले.
शतचण्डि यज्ञाला फडणवीस यांची हजेरी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेळापूर येथील पुरातन अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात जावून दर्शन घेतले. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी येथे आयोजित केलेल्या शतचण्डि यज्ञात सहभागी होवून शांती व विश्वकल्याणासाठी संकल्प सोडला