राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संसदीय कारकीर्द पूर्ण केलेले देशातील प्रमुख व एकमेव नेते .काल काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट एक पोस्ट प्रसिद्ध करत विधिमंडळा च्या प्रेक्षक गॅलरीत पहिल्यांदा आलो तेंव्हा पायरीवर पायावर पाय ठेऊन बसलो असता कर्मचाऱ्यांने मला बाहेर काढले .पण बाहेर जाता क्षणी पुनः इथे परत येईन अशी शपथ घेतली व पुनः आमदार होऊन विधिमंडळात आलो अशी आठवण सांगितली आहे.
वाचा शरद पवारांची पोस्ट जशी आहे तशी
काँग्रेस नेते श्री. हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास मुंबईतील विधानभवनात उपस्थित होतो. मी हे पुस्तक वाचले. अतिशय चांगले पुस्तक आहे. विधिमंडळात येणाऱ्या नव्या सदस्यांना मार्गदर्शक ठरेल, असे हे पुस्तक आहे.
मी या विधिमंडळात प्रेक्षक म्हणून पहिल्यांदा आलो. प्रेक्षकांच्या गॅलरीत मी पायावर पाय ठेवून बसलो असता कर्मचाऱ्यांनी हटकले आणि बाहेर काढले. बाहेर जाताक्षणी मी शपथ घेतली की, आता बाहेर जाईन, पण पुन्हा इथे येईन.. आणि नंतर आमदार होऊन मी विधिमंडळात आलो.
हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकालात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही.
देशाच्या संसदेने, राज्याच्या विधिमंडळाने याआधी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली आहेत. शेकाप नेते उद्धवराव पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस विषयाची चांगली तयारी करून मांडणी करत, सध्याचे मुख्यमंत्रीही अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी करतात.
हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील अतिशय शिस्तबद्ध होते. हर्षवर्धन पाटील त्यांचा वारसा योग्यरीत्या चालवत आहेत, त्यांचे हे पुस्तक निश्चितच नव्या सदस्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे.