पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांना काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ;वाचा सविस्तर-

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांकडूनही काही अपेक्षा व्यक्त केल्या . हे सरकार पारदर्शक कारभार करेल असं सांगत केवळ कोंडीत न पकडता कोंडी फोडण्यासाठी देखील पत्रकारांची मदत हवी आहे, असंही मत ठाकरेंनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार घेतल्यानंतरपहिल्याच पत्रकार परिषदेत या अपेक्षा व्यक्त केल्या.फक्त ओरबाडणं म्हणजे पत्रकारिता नाही. ज्याच्यावर टीका केली त्याला त्याच्या चुका कळायला हव्यात, असं काम करा.

तुम्ही सरकारचे कान, नाक आणि डोळे व्हा. सरकार केवळ घोषणा करतं, मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी झाली का, त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे का याची माहिती पत्रकारांकडून मिळावी. मला कारभारात पारदर्शकता हवी आहे. यासाठी मला पत्रकारांची मदत हवी आहे. योग्य गोष्टी आमच्या लक्षात आणून देण्यासाठी पत्रकारांनी मदत करावी.

मला पत्रकारांची मदत फक्त कोंडीत पकडण्यासाठी नाही, तर कोंडी फोडण्यासाठी देखील हवी आहे.मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना गोपनीयतेचीही शपथ घेतली आहे. त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही. हे समजून घ्या.माझ्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांवर उत्तराची अपेक्षा करु नका. मला वेळ हवा आहे. टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्नांवर काम करेल.

अजूनही मुख्यमंत्री झाल्यावर विश्वास बसत नाही : उद्धव ठाकरे

‘मी याआधी मंत्रालयात 2 ते 3 वेळा आलो.ते देखील काही ना काही लोकांची कामं घेऊन आलो. मला आत्ताही विश्वास बसत नाही की मी मुख्यमंत्री म्हणून येथे आलो आहे. आत्ता काहीजणांनी मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख केला, तर मी इकडेतिकडे पाहात होतो असेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: