22 ते 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे
मुंबई | राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले. तसेच क्यार वादळाचाही काही भागांमध्ये परिणाम झाला. या तुफान पावसामुळे पिकांचे तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात पाठवलेले पाच सदस्यांचे पथक आज गुरुवारी मुंबईमध्ये दाखल होत आहे. त्यानंतर या पथकाची तीन पथकांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. यानंतर हे पथक विविध भागातील नुकसानीची 22 ते 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. यानंतर केंद्राकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाईल.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक राज्यात दाखल होत आहे. या पथकामध्ये डॉ. के. मनोहरन, डॉ. आर. पी. सिंग, दीनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक औरंगाबाद महसूल विभागातील आपदग्रस्त भागाची पाहणी करेल. तर डॉ. आर. पी. सिंग यांचे पथक अमरावती व नागपूर महसूल विभागाची तर दीनानाथ व डॉ. सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिक महसूल विभागातील नुकसानीची पाहणी करणार आहे.