ग्लोबल न्युज नेटवर्क: माजी मुख्यमंत्री श्री. नारायण राणे यांनी फार मोकळेपणाने आपल्या जीवनाचा परिपाठ ‘झंझावात’ या पुस्तकाच्या माध्यमातून लिहिला आहे. त्यांच्या या आत्मचरित्राचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार, निलेश राणे आदी मान्यवर राजकीय नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले , नारायण राणे अतिशय लहान कुटुंबात जन्माला आले. वडिलांच्या आजारपणामुळे शिक्षण पूर्ण झाले नाही. संघर्ष साधा नव्हता, पण त्यांच्या मनात एक ईर्ष्या होती, म्हणून नारायण ते मुख्यमंत्री नारायण राणे असा प्रवास घडला.
६४-६५ साली महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे नावाचे वादळ तयार झाले. बाळासाहेबांच्या पाठिशी असंख्य तरुणांची फौज उभी असायची. या तरुणांपैकी नारायण राणे यांच्यावर बाळासाहेबांचा प्रचंड विश्वास होता. बाळासाहेबांनी नेहमीच नारायण राणे यांना पसंती दिली. नारायण राणे ८५ साली नगरसेवक झाले, बेस्टचे अध्यक्ष झाले, नंतर विधानसभेत आले मुख्यमंत्री झाले आणि सर्वच गोष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली.
राणे यांचे बजेटवरील भाषण खूप गाजले. अर्थसंकल्पावरील भाषण वाचून त्यांच्या प्रती असलेला आदर प्रचंड वाढला. अर्थसंकल्पावर उद्धवराव पाटील आणि राणेच चांगले भाष्य करायचे असेही पवार यावेळी म्हणाले.
अन्याय सहन न झाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि नंतर स्वतःच्या नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्राचा विकास करणे हीच राणेंची इच्छा आहे.
मालवण, कणकवली आणि संबंध कोकणाचा विकास राणेंनी केला. खासगी मेडिकल कॉलेज चालवणे हे काही सोपे नव्हते. मात्र राणेंनी मेडिकल कॉलेज उभे केले. हा प्रवास मांडणारं हे पुस्तक असंख्य तरुणांना प्रेरणा देणारे ठरणार आहे असे गौरवोद्गार ही पवारांनी यावेळी काढले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.