मुंबई । राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचं सांगण्यात येतं.
शिवसेनेवर फडणवीस यांनी कोणतीही टीका केली नाही, मात्र अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मित्रपक्षाला अधिक जागा मिळण्यात भाजपचे योगदान मोठे आहे. भाजपचे नेते सेना उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक मतदारसंघांमध्ये गेले पण सेनेचे नेते भाजपसाठी आले नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला. तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही. तीन पक्षांचे सरकार झाले तरी ६ महिने टिकणार नाही. त्यामुळे आपलेच सरकार येणार, असे फडणवीस म्हणाले. यशाने हुरळून जावू नका, जनतेशी असलेला संपर्कच तुम्हाला इथवर घेऊन आला. त्यामुळे कायम जनतेत राहा, हवेत राहू नका, या शब्दात फडणवीस यांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांचे कान टोचले. चंद्रकांत पाटील यांनी अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाल्याचे सांगून त्या संदर्भातील आकडेवारी दिली.
यावेळी फडणवीस यांनी सर्व आमदारांना मुंबईत न जाण्याचे आदेश दिले. आमदारांनी जनतेत जावं, काम करावं. मुंबईत थांबण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे निश्चित आहे. सत्तेसाठी भाजप काम करीत नसून, जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपला अतिशय भक्कम यश प्राप्त झाले. प्रत्येक विभागात भाजपला यश आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.