दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी राज्यातील आचारसंहिता शिथील करा मुख्यमंत्र्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई: लोकशाहीच्या महोत्सवातील महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. सोमवारी राज्यात 17 जागांसाठी मतदान पार पडले. सर्व जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कॅनालची देखभार इ. कामे ही तीव्र उन्हाळ्य़ात करावी लागतात. राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्कार जाहीर केला आहे. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने 4714 कोटींची मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच वार्षिक आराखड्यात यापूर्वीच मंजूर झालेल्या विविध प्रकारच्या कामांच्या निविदा बोलावणे, निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे, कामांचे कंत्राट देणे यालाही परवानगी देण्यात यावी. रूग्णालयीन सुविधा, रस्त्यांची कामे, महापिलाका आणि गाव पातळीवरची कामे इत्यांदींचा यात समावेश आहे. जी कामे पूर्वीपासून सुरू आहेत, त्याचा निवडणूक कामातील अधिकाऱ्यांना वगळून वेळोवेळी आढावा घेण्याचीही अनुमती या पत्रातून मागवण्यात आली आहे. यासाठी मंत्र्यांच्या दौऱ्यांनाही अनुमती प्रदान करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 2009 मध्ये अशाच प्रकारची अनुमती प्रदान करण्यात आली होती, याकडेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे. ही अनुमती दिल्यास दुष्काळी उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होईल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

admin: