खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
नवी दिल्ली : आर्टिकल ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायाधीशांच्या घटना पीठासमोर १ ऑक्टोबरपासून ही सुनावणी होईल. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्याचा निर्णय ५ ऑगस्टला संसदेत घेण्यात आला होता.
नवी दिल्ली : सात दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशात परतले. परदेश दौऱ्यावरुन परतलेल्या मोदींचे दिल्लीतील पालम विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताची दिल्लीमध्ये भव्य दिव्य तयारी करण्यात आली होती.
नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठीची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवली आहे. ही मर्यादा ३० सप्टेंबर २०१९ ला संपुष्टात येणार होती. शनिवारी सीबीटीडीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनातून ही माहिती देण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे ज्या लोकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर ते बंद होईल. त्यामुळे आर्थिक व्यवहार करता येणार नाही.
हरियाणा : दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या एका संशयित दहशतवाद्याला अंबाला छावणी परिसरातून अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनीच ही माहिती माध्यमांना दिली. अंबालाचे पोलिस अधीक्षक अभिषेक जोरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. मोहम्मद इस्माईल असे त्याचे नाव आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसने रोहन गुप्ता यांची सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी ही जबाबदारी दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या स्पंदना राम्या यांच्याकडे होती. गुप्ता हे गुजरातचे असून ते पक्षाचे खजिनदार अहमद पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिव्या स्पंदना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
नवी दिल्ली: निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधूश्री खुल्लर यांच्यासह चार माजी वरिष्ठ अधिकाऱ्यावर खटला चालविण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याविरोधात जो खटला चालवला जाईल त्यासोबत खुल्लर आणि इतर अधिकार विरोधातील खटला चालवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : युती सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले. आम्ही ते पुराव्यानिशी बाहेर काढले. मात्र एका मंत्र्यावरही कारवाई झाली नाही. उलट क्लिनचीट मास्टर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दोषमुक्त जाहीर केले. आपलं ठेवायचं झाकून.. हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. मुख्यमंत्री सुडबुद्धीचे राजकारण करत नाहीयेत का असा सवालाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय पक्ष होता. मात्र, वंचित आघाडीची स्थापना करताना प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षालाच बाजूला ठेवले आहे. बाबासाहेबांनी जाती अंताचा लढा दिला. मात्र, प्रकाश आंबेडकर आपल्या उमेदवारांच्या नावासमोर जात लिहीतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का? असा प्रश्न पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक : कारवाईचा लाभ घेणे म्हणजे पवारांचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शुक्रवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ईडी कार्यालयास भेट देणार होते. परंतु, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भेट देणे टाळले होते. हे सर्व कारवाईचा लाभ घेत पवार राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे.
सातारा: काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण , माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा पोटनिवडणूक लढविणार असल्याची चर्चा कराडसह जिल्ह्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढणार कि, लोकसभा निवडणूक लढविणार हे जाहीर करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सांगली : शरद पवार यांच्यावरील ईडीची कारवाई म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याचा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच रविकांत तुपकर यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेबाबत धन्यवाद मानत, चळवळीत प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याचे मत व्यक्त करत, ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स या मोदी व शाहांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपीही राजू शेट्टी यांनी केला आहे.
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने प्रारंभ होताआहे. तत्पूर्वी गेल्या भाद्रपद कृष्ण अष्टमी दिवशी सुरू झालेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रा आज रविवार अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटे पूर्ण होणार आहे. तीर्थ व काकडा आरती पार पडून श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य मूर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात येईल.
सोलापूर : आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरासह देवीच्या विविध मंदिरात घटस्थापनेची लगबग सुरू झाली आहे. मंदिर आणि सार्वजनिक नवरात्र महोत्सवांचे मंडप सजवण्यात आले आहेत. आज सकाळी सूर्योदयापासून दुपारी 01:41 पर्यंत घटस्थापना करता येईल असं पंचांगकर्ते ओमकार दाते यांनी सांगितलं आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने काही मंदिरात सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. आपल्या गावातल्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी तुळजापूरहून ज्योत पेटवून आणण्याची प्रथा पाळणारे अनेक कार्यकर्ते तुळजापुरला धावत जात असून ते आज घेऊन आपापल्या गावी पोहोचणार आहेत.
सोलापूर : यंदाची दिवाळी प्लास्टिक मुक्त साजरी करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा प्लास्टिक मुक्त अभियानाचे नोडल अधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता हीच सेवा तब्येत 27 ऑक्टोबरपर्यंत शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे यामुळे शहरे व गावे प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करण्यात येत आहे.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील तावशी गावच्या सरपंच सोनाली यादव यांनी गावाच्या स्वच्छतेबाबत उत्कृष्ट काम केल्याबद्दल केंद्र सरकारने त्यांची बेस्ट सरपंच म्हणून निवड केली आहे. येत्या 02 ऑक्टोबरला साबरमती येथे त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. सोनाली यादव या हा सन्मान प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सरपंच ठरल्या आहेत.
पंढरपूर : सोलापूर ग्रामीण मधील सहा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले. यावेळी पंढरपूर मधून काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांचा विचार झाले नसल्याचे सांगत कदाचित ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील अशी शक्यता वर्तविली. तर माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा न दिल्याचे सांगत अजूनही या नेत्यांचे परतीची आशा असल्याचे संकेत दिले.
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi