दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ७७.१० टक्के ; सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ८८.३८ टक्के

पुणे : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ८८.३८ टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६७.२७ टक्के इतका लागला आहे. एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा दहावीचा निकाल एकूण ७७.१० टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात तब्बल १२ टक्के घट झाली आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे गुणफुगवटा आटला आहे अशी माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

मार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या होती ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या होती ८ लाख ७० हजार ८८७. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के इतका लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे ७२.१८ टक्के त्याचमुळे यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. अशीही माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

admin: