पाकिस्तानचे दोन तुकडे केले पण इंदिरा गांधींनी श्रेय घेतले नाही! पवारांची मोदी-शहांवर टीका
औरंगाबाद: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देश निर्माण केला, हे मोठे कार्य होते, पण त्याचे श्रेय इंदिरा गांधींनी घेतले नाही, उलट त्या म्हणाल्या देशाच्या जवानांनी हे शौर्याचे काम केले आहे त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासारखे आहे, असे असताना आज मात्र परिस्थिती उलटी आहे, देशाच्या जवानांनी केलेल्या कार्याचे श्रेय घेतले जात आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारचे संतोष कोल्हे, संतोष माने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेसाठी शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, ते वेरुळ येथे पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी पदवीधरचे आमदार सतिश चव्हाण यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, दहशवादाचे स्थळे उद्ध्वस्त करण्यासाठी जवानांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटविण्याचा निर्णय हा कोणा एकाचा नाही, हा सामुदायिक निर्णय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. याचे श्रेय घेणाऱ्या भाजपा नेतृत्वावर त्यांनी सडकून टीका केली.
सर्जिकल स्ट्राईक, जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटविल्याचा मुद्दा समोर करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान, नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचार सभेच्या भाषणात करीत आहेत, हाच धागा पकडून शरद पवार यांनी ही टीका केली.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत, त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, कारखाने बंद पडत आहेत, अशा एक ना अनेक समस्या महाराष्ट्रात असताना त्यावर सत्ताधारी मंडळी बोलत नाही, उलट विरोधकांन टार्गेट केले जात आहे, हे स्पष्ट करत शरद पवार यांनी निवडणूक कालावधीत काँग्रेस कार्यालयावर टाकलेल्या धाडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत यापुर्वी असे कधी घडले नाही, सुडाने कारवाई केली नाही, अशा दडपशाहीमुळे गांधी विचार नष्ट होणार नाही, दीडशे वर्ष सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीशांना देशातून जावे लागले, याचीही त्यांनी आठवण करून दिली. या प्रसंगी माजी आमदार अण्णासाहेब माने, महेश उबाळे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वारसासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता शरद पवार म्हणाले, राजकीय वारसा हा नियुक्त करता येत नाही, तो लोकसंमतीने आणि लोकस्वीकृतीतून निर्माण होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठला वारसा होता, भाजपामध्ये वारशाचा विचार झाला असता आज लालकृष्ण आडवाणी या पदावर असते, लोकांनी मोदींना स्वीकारले म्हणून ते पदावर आहेत.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi