मुंबई : राज्यावर करोनाचं संकट असताना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. “परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणं शक्य नाही असं लक्षात आलं आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, करोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आलं होतं. करोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होतं. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.
दुसरीकडे, तब्बल २ महिने राज्य बंद होते. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेले महाराष्ट्र पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अनलॉक १ मध्ये सरकारी आणि खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी दिल्यामुळे नोकरदार वर्ग बाहेर पडला आहे. त्यामुळे दिवशी मुंबईसह राज्याच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. राज्याच्या अनेक भागात अशीच गर्दी पाहायल मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज झालेल्या पत्रकार परिषदेत गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन कराव लागेल असा इशारा राज्यातील जनतेला दिला आहे. तर कोरोनाला रोखायच असेल तर गर्दी टाळा असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.