अहमदनगर | पावसाळ्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून असलेले सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यावर्षीचे हाता तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याची धास्तीने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली अन ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यावर्षी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळाले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना देखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.
मात्र गेल्या आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे तर डिसेंबर संपत आला तरी थंडी अजुनही वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी, उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर मावा आला आहे. यासोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे बघायला मिळते.
या प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्याला देखील करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्यात आली आहे. या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांच्या फवारऱ्या सुरु केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. परंतु हवामान सुधारले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.
मागील वर्ष दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी शेवटी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय या धास्तीने शेतकरीवर्ग संध्या चिंतेत पडला आहे.