दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वाचा घटक आहेत आणि त्यांची काळजी किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांकडे आपले लक्ष असणे खूप महत्वाचे आहे.
‘वृद्धत्व अतिशय कठीण!’ असे उद्गार आपण अनेकदा ऐकतो आणि त्यावर वृद्धांच्या मानसिकतेला गृहीत धरतो. परंतु आपण एक गोष्ट बऱ्याचदा पाहतो ती म्हणजे काही जेष्ठ मंडळी त्यांच्याहून वयाने लहान किंवा पुढील पिढीतील मंडळींसोबत मिळून मिसळून राहण्याचा खूप प्रयत्न करतात. त्यांच्या अंतरंगात दु:ख नसतं असं नसतं.
मात्र ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळाढाकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल.
ज्येष्ठांचे देखील तीन प्रकार असतात. साधारण 58 ते 65 वयोगट, 65 ते 75 वयोगट आणि 75 आणि त्यापुढील वयोगट अशा तीन प्रकारांत ज्येष्ठांची विभागणी होते.
आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे.
या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. पण बाकी समस्यांसाठी समुपदेशन प्रभावी ठरू शकते.
1 ते 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 ते 50 वर्ष गृहस्थाश्रम, 50 ते 75 वर्ष वानप्रस्थाश्रम त्यानंतर 75 ते 100 वयात संन्यास अशा या स्थिती आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरिक वानप्रस्थाश्रमाच्या पुढे गेलेले असतात, पण त्यांची जीवनासक्ती संपलेली नसते. खाणं, पिणं, कपडालत्ता, दागदागिने, प्रवास, लग्न, मुंज, सणवार अशा सर्व गोष्टींत त्यांचा उत्साह टिकून असतो. मग असे ज्येष्ठ मनोमन स्वत:ची तरुण पिढीशी तुलना करतात. बरोबरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो.
आपल्याला आवडणारे उद्योग, छंद त्यांनी जोपासायचा प्रयत्न करावा. यातून त्यांचा उत्साह आणि स्वभावातील समाधान जागृत राहील.