खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ
टोकियो : जपानमध्ये हाजिबीस टायफून वादळाने थैमान घातले आहे. येथे मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे, अशी माहिती स्थानिक वृत्त संस्थेने दिली आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी मृतांविषयी दुःख व्यक्त केले आहे. हाजिबीस टायफूनचे संकट उभे असतानाच काल सकाळी जपान ५.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले. भूकंपाचे केंद्र चिबा-केन प्रदेशात जमिनीखाली ८० किलोमीटरवर होते.
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवादा विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. जर तुम्ही दहशतवादा विरोधात लढा देण्याचा गांभिर्याने विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला हवी ती मदत करु, असे त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना उद्देशून म्हटले आहे. ते कर्नालमधील एका प्रचारसभेत बोलत होते.
मुंबई : देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्यावर भाष्य करावे, असे आव्हान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिले आहे. मुंबईतील चांदिवली येथील प्रचारसभेत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पीएमसी बँकेचे संचालक कोण होते? ते कोणाचे पाहुणे होते? या घोटाळ्यामध्ये किती लोकांचे नुकसान झाले? किती लोकांना पैसे दिले? असे अनेक प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली.
पुणे : पिंपरी – चिंचवड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला. यामुळे काही काळ सभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पंकजा मुंडे बोलत असताना पाच ते सहा जणांनी अचानक घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ सभेत बाधा निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर सभा पुर्ववत सुरु झाली. घोषणा देणारे लोक हे रिंगरोड बाधित असल्याचे माहिती आहे.
पुणे : शिरूर तालुक्यात काल भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांच्या प्रचारार्थ भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीतून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे रहाण्याचे आवाहन अमित शाहंनी यावेळी केले. शिवाजी महाराजांना वंदन करुन अमित शहांनी रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
सातारा : मी कडक बोलतो, रोखठोक बोलतो पण, स्पष्ट बोलतो. कुणाची दिशाभूल करणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असला धंदा या सत्ताधाऱ्यांनी चालवला असल्याचेही अजित पवार म्हणाले. फलटणचे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपोडे गावात आयोजित सभेत अजित पवार बोलत होते.
जळगाव : जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 अ हटविण्याचा घेतलेला निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अभूतपूर्व निर्णय होता. राष्ट्रहिताचा असलेल्या या निर्णयाबद्दल काही राजकीय पक्ष व नेते राजकारण करत आहेत. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि कलम 35 अ परत लागू करण्याचा उल्लेख करावा, असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिले. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा रविवारी दुपारी जळगावात पार पडली या सभेत मोदी बोलत होते.
जळगावं : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी वैराग येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केलेल्या टीकेवेळी आक्षेपार्ह हातवारे केले होते. पवारांच्या या कृतीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पराभव समोर दिसायला लागला की माणसाची विवेक बुद्धी हरपायला लागते, उत्तर तर आम्हाला ही देता येते, पण नटरंग सारखे हातवारे आम्हाला करता येत नाही, असा टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
लातूर : चांद्रयान मोहिम, जम्मू काश्मीर यासारखे मुद्दे उपस्थित करत मोदी सरकार देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला. चांद्रयान मोहिमेबद्दल आम्हालाही अभिमान आहे. इस्त्रोची स्थापना काँग्रेसने केली होती, याची आठवण करुन देत फक्त चंद्रावर रॉकेट सोडून देशातील जनतेचे पोट भरणार नाही, या गोष्टीकडे राहुल गांधींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला लातुरमधील औसतमधील प्रचार सभेत ते बोलत होते.
सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यचा दौर्यावर येणार आहेत. उध्दव ठाकरे यांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 जाहीर सभा आयोजन करण्यात आली असून, सोलापूरशहर मध्य मतदार संघात सेनेचे उमेदवार दिलीप माने (रात्री 08 वाजता), बार्शी मतदार संघातील दिलिप सोपल, करमाळा मतदार संघाचे उमेदवार रश्मी बागल तर सांगोला मतदार संघात शहाजी पाटील यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे जाहीर सभेला संभोधित करणार आहेत.
सोलापूर : सोलापूर शहर मध्यचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम गुरुजी यांच्या प्रचारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव माजी खासदार कॉ.सीताराम येचुरी हे 19 ऑक्टोबर रोजी सोलापूरात येणार असल्याची माहिती अँड.एच.एच. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर आज कॉर्नर सभेसाठी पुण्याचे माकपचे राज्य समिती सदस्य प्रा.अजित अभ्यंकर व बार्शीचे कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण न पटल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण सोलापूर जिल्ह्याचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी काल रविवारी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कै. वि.गु.शिवदारे, कै. भीमराव पाटील वडकबाळ यांनी घालून दिलेलं आदर्शवर आपला काम असेल मात्र दुर्दैवाने त्यांची पुढील पिढी दिशाहीन झाले असून सत्ताधाऱ्यांपुढे स्वाभिमान गहाण टाकल्याचे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
तुळजापूर : महाराष्ट्राची आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविकांनी हजेरी लावत आई राधा उदोs उदोच्याs गजरात सुमारे 5 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
मंगळवेढा : पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधारकपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची भोसे येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांनी आमच्यावर आम्ही नसताना खोटे गुन्हा दाखल केल्याचे आरोप केला. त्यामुळे आमचे अनेक दिवस कोर्टात हेलपाटे मारण्यातच गेल्याचे सांगितले.
अक्कलकोट : अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सचिन कल्याणशेट्टी यांना निवडून द्या पाणी देण्याची जवाबदारी आमची. सध्या सरकार आमचे आहे, निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ कुंभारी व बोरामणी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
अक्कलकोट :राज्यात भाजपच्या सरकारने जी कर्जमाफी दिली ती कर्जमाफी नसून कर्ज वसुली होती. खरी कर्जमाफी काँग्रेस ने केली. भाजपचा हा सगळ भुलभुलैय्या आहे. त्यामुळे त्यांच्या भूल थांपानां बळी पडू नका असे आवाहन विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. तालुक्यातील चप्पळगाव,बोरेगाव,दर्शनाळ,अरळी, पितापूर, डोंबरजवळगे येथे आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यात ते बोलत होते.
मागठाणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे येथील आपल्या जाहीर सभेत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवू असे म्हणत हे सरकार सत्तेवर आले आणि यांच्या पाच वर्षांच्या काळात तब्बल १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. या सरकारच्या बेबंदशाही कारभाराला रोखण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. राज्याप्रमाणे केंद्रातही सक्षम विरोधी पक्षाची उणीव असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
अमरावती : देशातील काँग्रेसची कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी रेड्डी काँग्रेस तर कधी चड्डी काँग्रेस झाली अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. 65 वर्षात काँग्रेस पक्षाने देशाचा कोणता विकास केला याचे चिंतन करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.