चितळे समूहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन
भिलवडी : भिलवडी येथील मे.बी.जी. चितळे डेअरीचे संचालक प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा ककासाहेब चितळे (वय-७८) यांचे मिरज येथे हृदय विकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले.
शुक्रवारी रात्री प्रकृती अस्वस्थ्या मुळे त्यांना मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली.त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे,मकरंद चितळे दोन मुले व मुलगी सौ वीणा सहस्त्रबुद्धे,सूना नातवंडे असा परिवार आहे.मॅकेनिकल इंजिनिअर चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडील बाबासाहेब चितळे व भावंडा सोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले.
जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन मुंबई या संस्थेचे मध्यवर्ती समिती सदस्य,जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन २ क चे माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे गेली २७ वर्षांपासून अध्यक्ष,भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक,मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते,विवेकानंद नेत्र चिकित्सालय,लायन्स नँबचे आश्रयदाते अशा विविध संस्था च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य,नेत्रदान,रक्तदान,औद्योगिक चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या दुग्ध उद्योग क्षेत्रासह कृष्णाकाठावर परिसरावर शोककळा पसरली आहे.