आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षात सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर आणले आहे. आमच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत व त्यांनी महाराष्ट्राला भरभरून मदत केली. पाच वर्षांत आपले सरकार दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, मराठा, ओबीसी, धनगर अशा सर्व समाजघटकांच्या पाठीशी उभे राहिले. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पाच वर्षांपूर्वी 2014 साली महाराष्ट्रात महिनाभर राहून नेतृत्व केले आणि राज्यात भाजपाची सत्ता आली. आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पाठिंब्याने भाजपा पुन्हा मोठे यश मिळेल, गेल्या वेळेपेक्षा दीडपट जागा जिंकून भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश खाडे व सदाभाऊ खोत, यात्राप्रमुख भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, खा. डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर ,महाहौसिंग चे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे,उपस्थित होते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, आ. जयकुमार गोरे व आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
त्यांनी सांगितले की, महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यात एकूण 2649 किलोमीटरचा प्रवास झाला, 90 विधानसभा मतदारसंघांना भेट दिली आणि 120 सभांना संबोधित केले. यात्रेला महाराष्ट्रात जनतेचे अभूतपूर्व समर्थन मिळाले. आपण आभारी आहोत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये जनतेचा प्रचंड सहभाग होता. विशेषतः महिला व तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात्रेचा तिसरा टप्पा 13 सप्टेंबर रोजी सुरू होत असून पश्चिम महाराष्ट्र व कोकणात ही यात्रा जाईल. तिसऱ्या टप्प्याच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्याचा सर्वांगिण विकास केला आणि अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले. त्यामुळे महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल आणि मा. देवेंद्र फडणवीस पुन्हा सरकार स्थापन करतील.