बार्शी:
विरोधक हा खोटा बोलणारा माणूस असून आजपर्यंत त्यांनी तालुक्याचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. तसेच ते जातीयवादाचे विष पेरुन मते मागत आहेत. मात्र मला तालुक्यात हरितक्रांती व औद्योगिक क्रांती करुन तालुक्याचा विकास करावयाचा आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यातील जनता या निवडणुकीत मला निश्चित संधी देईल, असा विश्वास व्यक्त करत आमदार म्हणून विरोधकाने काय केले हे त्यांनी सांगावे. दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचा व जनावराचा तरी विचार या माणसाने केला नाही तो तुमचा काय विचार करणार अशी टीका बार्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत जुना गांधी पुतळा येथे आयोजित प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, संतोष निंबाळकर, अनिल डिसले, कपिल कोरके, विजय राऊत, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, पांडुरंग गव्हाणे, प्रशांत कथले, शंकर वाघमारे, नवनाथ चांदणे, अॅड. वासुदेव ढगे, बाळासाहेब पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्रमुख नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
पुढे बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले की, 1985 पासून तालुक्याला लागलेले ग्रहण काढण्याचा मी प्रयत्न करतोय. मी आमदार असताना ढाळे-पिंपळगांव मध्यम प्रकल्प, ब्रॉडगेज रेल्वे, एमआयडीसी मंजुरी, उपसा सिंचनासाठी निधी आदी प्रश्न मार्गी लावले. तालुक्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला. मी स्वतःसाठी काहीच मागितले नाही, असे सांगत तालुक्याचे वाटोळे करणार्या विरोधकाची तलप जिरावयाची आहे. त्यासाठी सर्वांनी साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
नगरपालिकेच्या माध्यमातून भगवंत स्टेडियम, 350 गाळ्यांची विविध शॉपिंग सेंटर, ऑक्सिजन पार्क, बागा, शहरात 7 हजार एलईडी लाईट बसविल्या. भुयारी गटारीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 7 हजार घरकुले दिली. तालुक्यात तब्बल 500 कोटींचा निधी आणला. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भुयारी गटारी योजना 4 महिन्यात पूर्ण होईल. विकास कामे होत असताना धुरळा उडत असतो. मात्र विरोधक हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका केली. शहरातील साडेतीनशे विविध रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून निवडणुका पूर्ण होताच ही सर्व कामे सुरु होतील. विरोधक हा बोगस माणूस असून तालुका देशोधडीला लावला आहे. सोलापूर रस्त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर असून त्या रस्त्याचे काम चालू आहे. जैन मंदीर ते जामगांव हद्द या शहरातील चार पदरी रस्त्यासाठी 56 कोटी रुपये मिळणार आहे.
यंदा भयानक दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. या काळात आम्ही गप्प न बसता टँकरने पाणीपुरवठा केला. मात्र विरोधक पाण्यावर राजकारण करीत आहेत. तालुक्यात 5 साठवण तलाव, उप जिल्हा रुग्णालय, 40 गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना, झेडपीच्या माध्यमातून रस्ते व दलित वस्त्यांसाठी भरीव निधी आणला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम उभे राहिले आहे. एक-दोन गावे आदर्श होवून चालणार नाही तर तालुक्यातील सर्व गावे आपण सर्व मिळून आदर्श करु. नाकर्ते असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार म्हणून तालुक्यासाठी काय केले असा सवाल करीत यांनी कोणती बैठक घेतली का? विनाकारण जातीवाद करुन लोकांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका करत विरोधक म्हणजे डाकुची एकत्र असलेली गँग आहे.
आरएसएममधील फ्लॅटधारकांना फ्लॅट नावावरुन करुन दिले का? असा सवाल करीत मिरगणे, आंधळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. उद्धव ठाकरे यांना मला गद्दार म्हणण्याचा कसलाही अधिकार नाही. मराठा मोर्चाला मुका मोर्चा कोण म्हणाले हे सर्वांना माहीत आहे, असेही राऊत म्हणाले.