मुंबई: विश्वातल्या संपूर्ण जनतेवर कोरोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तीगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद पाहिल्यानंतर आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचे कौतुक केले आहे.
परंतु इथेच समाधान मानून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचं सुचवलेलं आहे त्याला आपण सगळेजण साथ देऊ या आणि सर्वसामान्य माणसाला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.