कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी अगोदर करमाळ्यातील दुष्काळी भागात सोडा-रश्मी बागल
करमाळा: सध्या कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी इतर भागाला न सोडता अगोदर करमाळ्यातील सीना नदीत सोडावे आणि पर्यायाने सीन-कोळगाव धरण भरून घ्यावे अशी मागणी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी केली.
करमाळा तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही त्यामुळे वीट, मांगी तलाव, रावगाव, भोसे, कोर्टी, कुंभेज, सावडी, कुंभारगाव, मोरवड, कुस्करवाडी, पौधवाडी, गोरेवाडी, हुलगेवाडी वंजारवाडी, हिंगणी, राजुरी, पारेवाडी, झरे, पोफलज, जातेगाव, कामनेहा भाग अजूनही तहानणलेलाच आहे. जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी इतर ठिकाणी न सोडता आदी भागात सोडावे.
कुकडी प्रकल्पा अंतर्गत येणारा कुकडी डावा कालवा, चिलवडी शाखा कालव्या वरून कोर्टी वितरक, कोर्टी लघू वितरक अंतर्गत जवळपास 2000 ते 2500 हेक्टर क्षेत्र कुकडी लाभ क्षेत्रात येते. या कालव्याचे काम पूर्ण होऊन 18 वर्षे झाली आहेत. परंतु, या 18 वर्षात केवळ एक वेळाच आवर्तनाचे पाणी मिळाले आहे. आज घडीला तालुक्यात पाऊस अत्यल्प झाल्याने अजूनही दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. एप्रिल 2019 पासून अनेक गावांमध्ये माणसांना पिण्यासाठी आणि जनावरे जगविण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यातून कुणाचीच तहान भागत नाही.
तालुक्यातील जनतेला दुष्काळ मुक्त करण्यासाठी सीना-कोळेगाव धरण अगोदर भरून घ्यावे. त्याचबरोबर कुकडी प्रकल्पांतर्गत येणारे सर्व तलाव आणि पाझर तलाव भरून घ्यावेत व त्यानंतर इतर भागाला पाणी सोडावे. त्यामुळे अनेक गावांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल.