लडाख । काश्मीर प्रश्नावर बोलण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पाकिस्तान विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असला, तरी त्याला फारसे यश मिळणार नाही. कोणताच देश पाकिस्तानच्या पाठिशी उभा राहणार नाही, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ते लडाखमध्ये आयोजित डीआरडीओच्या कार्यक्रमात बोलत होते.
दहशतवादाचा वापर करुन पाकिस्तान भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याशी कशी चर्चा करु शकतो? आम्हाला पाकिस्ताबरोबर चांगले संबंध हवे आहेत. पण त्यांनी आधी भारतात दहशतवाद पसरवणे बंद करावे असे राजनाथ सिंह म्हणाले. काही दिवसांपूर्वी राजनाथ यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तान बरोबर आता पीओकेवर चर्चा होणार असे म्हटले होते.
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, मला पाकिस्तानला असा प्रश्न विचारायचा आहे की काश्मीर कधी तुमचे होते. काश्मीर हा कायमच भारताचा अविभाज्य घटक राहिला आहे. त्यामुळे या प्रश्नावर कोणतीही भूमिका घेण्याचा पाकिस्तानला अधिकारच नाही. उलट पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील अत्याचार आणि मानवी अधिकारांचे होणारे उल्लंघन रोखण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.