सोलापूर : राज्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने घटल्याने अपेक्षित उत्पादनातही 40 लाख मेट्रिक टन घट झाली आहे.
दुसरीकडे गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला. आता उन्हाळी कांदा लागवडीच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे, मात्र फेब्रुवारी 2020 पर्यंत कांद्याची अपेक्षित आवक वाढणार नाही, असे फलोत्पादन विभागाने सरकारला स्पष्ट केले आहे.
दरवर्षी किमान 30 टक्के कांदा निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र तब्बल अडीच लाख हेक्टरने घटले आहे. सोलापूर, नाशिकसह अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याने 20 हजारांचा उच्चांक गाठला आहे. कांद्याच्या वाढत्या दराबाबत राज्य व केंद्र सरकारकडून संयुक्तपणे उपाययोजना करण्यात येत आहेत.
मात्र, महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने कांदाच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तुर्कस्तानवरून सहा हजार मेट्रिक टन तर इराणहून एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्यात आला आहे. आता इजिप्तहून एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याच्या फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, कांदा आयात करूनही महाराष्ट्रासह देशातील कांद्याचे दर पुढील दोन महिन्यांपर्यंत तेजीतच राहतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्याची तुलनात्मक स्थिती
कांदा लागवडीचे क्षेत्र कांदा उत्पादन
2016-17 -4.71 लाख हेक्टर91.06 लाख मे. टन
2017-185.13 लाख हेक्टर90.73 लाख मे. टन
2018-194.50 लाख हेक्टर80.47 लाख मे. टन
2019-202.45 लाख हेक्टर42.19 लाख मे. टन