द औरंगाबाद | कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र औरंगाबादमध्ये पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
देवगडहून औरंगाबादला जात असताना मनोज जाधव यांची गाडी अडवण्यात आली. त्यांनी आपण पत्रकार असल्याचं पोलिसांना सांगितलं तसेच सोबतचं आयकार्ड देखील दाखवलं मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना मारहाण केली. माझं नाव-नंबर पाहा आणि तुला काय करायचं ते कर, अशी अरेरावीची भाषा करत त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
मारहाण करणारे पोलीस गंगापूर पोलीस ठाण्याचे आहेत. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे पीआय सुरवसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच आहेत मात्र औरंगाबाद पोलिसांनी दादागिरी करत या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी संबंधित पोलीसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.