नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील प्रकरणाचा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला आहे. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. यावर आता AIMIM चीफ असदुद्दीन ओवैसींनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला भीक नको, ही पाच एकर जमीनीची दिलेली ऑफर परत करण्यात यावी असे ते यावेळी म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ‘मी वकीलांच्या टीमचे आभार मानतो. सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, मात्र ते अचूक नाही. या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मताशी मी सहमत आहे. मुस्लिम समाजाने आपल्या हक्कासाठी संघर्ष केला. आम्हाला भिक देण्याची गरज नाही. माझे वयक्तिक मत आहे की, आम्हाला 5 एकर जागेची दिलेली ऑफर परत करायला हवी. फॅक्टवर आस्थेचा विजय झाला आहे. संघ आता काशी आणि मथुरेचे मुद्देही उचलून धरेल याची मला चिंता आहे.’